मराठी पत्रकार

गोव्याच्या दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांचा हा अधिकृत ब्लॉग समस्त पत्रकार मित्रांसाठी...

माध्यम चर्चा

पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com


Friday, August 16, 2013


एक सफर माध्यमांच्या दुनियेची...




या सार्‍या खटाटोपाच्या मुळाशी आहे तो सामान्य माणूस. या देशातील अडलेल्या नडलेल्या, खचलेल्या पिचलेल्या सर्वसामान्य माणसाला आधार आहे तो प्रसारमाध्यमांचा. त्याच्याकडे तो विश्वासाने आणि आशेने पाहतो आहे. आपला आवाज बुलंद करणारे कोणी तरी आहे हा त्याचा विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आणि आजच्या व्यावसायिक कालखंडातही पूर्वसुरींनी घालून दिलेल्या पत्रकारितेच्या उर्जस्वल परंपरेला तिलांजली द्यायची नाही एवढे भान जरी प्रसारमाध्यमांमध्ये वावरणार्‍या प्रत्येकाने ठेवले तरी पुरेसे आहे. काळ बदलेल. वाचक बदलेल. तंत्रज्ञान बदलेल. माध्यमेही बदलतील. बदलणार नाहीत ती पत्रकारितेची मूलतत्त्वे! त्यांच्याशी बांधीलकी राखणे हेच आजचे सर्वांत मोठे आव्हान ठरले आहे.


परेश प्रभू,
संपादक, दैनिक नवप्रभा


शतकाहून मोठी परंपरा असलेले ‘वॉशिंग्टन पोस्ट’ हे वृत्तपत्र गेल्याच आठवड्यात ‘अमेझॉन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचा संस्थापक जेफ्री पी. बेझोस याने ग्रॅहॅम कुटुंबाकडून २५० दशलक्ष डॉलरना विकत घेतले, तेव्हा या घटनेचे वर्णन अन्य एका संकेतस्थळाने ‘आईसबर्ग जस्ट रेस्क्युअड् द टायटॅनिक’ (टायटॅनिकला हिमनगाने नुकतेच वाचवले) अशा चपखल शब्दांत केले होते. टायटॅनिक जहाज हिमनगाला आदळून फुटले होते हे ठाऊक असलेल्यांना या उद्गारांची अर्थपूर्णता सहज लक्षात येईल. जगभरातील वर्तमानपत्रांपुढे नव्या ‘ऑनलाइन’ माध्यमांनी आव्हान उभे केलेले असताना एका संकेतस्थळाच्या संस्थापकाने त्यातून मिळवलेल्या अफाट संपत्तीतून एका वर्तमानपत्राला दिवाळखोरीपासून वाचवणे याला आजच्या संदर्भात विशेष अर्थ आहे.
प्राचीन काळी चक्रवर्ती राजे अश्वमेध करून श्वेतवर्णीय अश्व दौडवित. हा घोडा जिथे जिथे जाई, तेथे त्या सम्राटाच्या राज्याचा विस्तार होत असे. हा अश्वमेध थोपविण्याची धमक जो दाखवी तो तितकाच तुल्यबळ असावा लागे. आज माध्यमांच्या क्षेत्रामध्येही माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित झालेल्या नव्या आधुनिक, सुलभ माध्यमांचा असाच अश्वमेध संपूर्ण जगाच्या पटलावर सुरू आहे आणि तो थोपवायचा की त्यावर स्वार होऊन पुढे जायचे या संभ्रमात जगभरचा पारंपरिक माध्यम उद्योग पडलेला आहे.

युरोप - अमेरिकेत वृत्तपत्रे संकटात

पाश्‍चात्त्य विश्वामध्ये या नव्या माध्यमांनी आपला प्रताप दाखवण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिकेत गेल्या पाच वर्षांत वर्तमानपत्रांचा खप सतरा टक्क्यांनी घसरला. पश्‍चिम युरोपमध्ये जवळजवळ बारा टक्क्यांनी आणि पूर्व आणि मध्य युरोपमध्ये दहा टक्के खप घसरला. पाश्‍चात्त्य राष्ट्रांमध्ये वृत्तपत्रव्यवसाय संकटात आहे याचे हे संकेत आहेत. तेथील अनेक प्रतिष्ठित वर्तमानपत्रांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वाढता निर्मिती खर्च सोसत नसल्याने ‘न्यूजविक’ सारख्यांनी केवळ ‘ऑनलाईन’ स्वरूपात आपले अस्तित्व ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे आणि काही लवकरच त्या मार्गाने जाण्याच्या विचारात आहेत. अनेक वृत्तपत्रे आर्थिक गणिते कोलमडल्याने गेल्या काही वर्षांत बंद पडली, काहींनी दिवाळखोरी जाहीर केली, तर अनेकांनी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबिला. सन २००१ पासून आजवर अमेरिकेतील वृत्तपत्रांतील कर्मचार्‍यांची संख्या एक पंचमांश कमी झाली आहे. वृत्तपत्रांचा महसूल सन २००५ मधील ६० अब्ज डॉलर्सवरून २०११ मध्ये अर्ध्यावर म्हणजे ३३.८ अब्ज डॉलरवर घसरला आहे. पाश्‍चात्त्य जगतामध्ये वर्तमानपत्रांच्या खपाची ही घसरण मध्यंतरी येऊन गेलेल्या जागतिक आर्थिक मंदीमुळे तर आहेच, त्याच बरोबर नव्या डिजिटल माध्यमांच्या वाढत्या लोकप्रियतेचाही त्यात वाटा आहे. इंटरनेट आणि मोबाईल आणि टॅब्लेटच्या वाढत्या प्रसारामुळे वर्तमानपत्र वाचण्याची गरज तेथील नव्या पिढीला भासेनाशी झाली आहे. वर्तमानपत्र नाही वाचले तरी चालते अशी धारणा तेथे हळूहळू बनत चालली आहे. मुद्रित वर्तमानपत्रापेक्षा डिजिटल स्वरूपातील वृत्तपत्र वाचणे अधिक सुलभ आणि नेटके भासू लागले आहे. नुकतीच बँकॉकला ६५ वी जागतिक वृत्तपत्र परिषद झाली. त्यात सत्तर देशांतील दीड हजार प्रतिनिधींनी हीच चिंता व्यक्त केली. वाचक झपाट्याने डिजिटल साधनांकडे वळू लागला आहे आणि डिजिटल माध्यमांतून मिळणारा महसूल हा मूळ खर्च भागवू शकत नाही अशी ही चिंता होती.

आशियात आशादायी चित्र

मात्र, एकीकडे हे स्थित्यंतर सुरू असताना पूर्वेला, विशेषतः आशिया खंडामध्ये याच्या नेमकी उलट स्थिती दिसते. आशिया खंडात वर्तमानपत्रांचे खप वाढत आहेत आणि गेल्या पाच वर्षांत ते सोळा टक्क्यांनी वाढले आहेत. अनेक नवनवी वर्तमानपत्रे येत आहेत, आवृत्त्या निघत आहेत, खपाचे नवे नवे उच्चांक प्रस्थापित करीत आहेत.
वृत्तपत्रचालकांची जागतिक संघटना असलेल्या ‘वॅन (वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स) - इफ्रा’ चे सीईओ ख्रिस्तोफर रीस यांनी वृत्तपत्रसृष्टीतील या घडामोडींचे अत्यंच चपखल वर्णन केले आहे. ते म्हणाले की, ‘सर्क्युलेशन इज लाईक अ सन. इट रायझीस इन ईस्ट अँड डिक्लाईन्स इन द वेस्ट.’ म्हणजे वर्तमानपत्रांचा खप हा सूर्यासारखा आहे. तो पूर्वेला उगवतोय आणि पश्‍चिमेला मावळतोय! हे उद्गार शब्दशः खरे आहेत.
हे असे का, हा प्रश्न अर्थातच माध्यम जगतातील जाणकारांना सतावू लागला आणि त्यांनी त्याची काही कारणे दिली. विकसनशील देशांतील वाढती साक्षरता, त्यातून निर्माण होणारा नवा वाचक, उंचावणारे जीवनमान आणि त्यातून निर्माण होत असलेला नवमध्यमवर्ग, त्याची वाढती क्रयशक्ती यांना त्यांनी या खपवाढीचे श्रेय दिले. परिणामी, भारत आणि चीन या आज जगातल्या सर्वांत मोठ्या वृत्तपत्र बाजारपेठा ठरल्या आहेत, ज्या अधिकाधिक विस्तारत जातील असे तज्ज्ञांना वाटते.
जगातील खपाच्या दृष्टीने आघाडीच्या शंभर वर्तमानपत्रांची यादी जर बनवायला घेतली, तर त्यातील तीन चतुर्थांश वर्तमानपत्रे ही आशिया खंडातील आहेत.

प्रादेशिक वर्तमानपत्रांचे युग

केवळ भारतासंदर्भात विचार करायचा झाला तर येथे जी वाढती वृत्तपत्र बाजारपेठ आहे ती मुख्यत्वे प्रादेशिक वर्तमानपत्रांची आहे असे दिसेल. आज देशातील टॉप १० वर्तमानपत्रांची यादी पाहिली तर त्यामध्ये केवळ एक इंग्रजी दैनिक आहे. बाकी सर्व दैनिके ही प्रादेशिक भाषांतील आहेत. देशातील सर्वोच्च खपाची पहिली तिन्ही दैनिके हिंदीतील आहेत. दोन मल्याळम, एक तामीळ आणि एका मराठी दैनिकानेही या यादीमध्ये मानाचे स्थान मिळवलेले आहे. भारतात रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्सकडे नोंदणी झालेली जी एकूण ८६,७५४ वृत्तपत्रे ३१ मार्च २०१२ अखेरीस आहेत, त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळजवळ ३४ हजार ६५१ वृत्तपत्रे ही हिंदी आहेत. इंग्रजी नियतकालिकांची संख्या फक्त ११,९३८ आहे. सर्वाधिक प्रकाशने असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचा पहिला आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. वर उल्लेख केलेल्या ८६ हजार वृत्तपत्रांचा एकूण खप ३७ कोटी ३८ लाख ३९ हजार ७६४ आहे. भारताची १२१ कोटी लोकसंख्या विचारात घेतली, तर या लोकसंख्येतील ३० टक्के लोक वृत्तपत्रे विकत घेतात. प्रत्येक कुटुंब सरासरी चार सदस्यांचे असे जरी मानले आणि साक्षर लोकसंख्येचे प्रमाण विचारात घेतले, तरी अजूनही वर्तमानपत्रांना प्रादेशिक बाजारपेठेमध्ये विस्तार करण्यास मोठा वाव आहे. नवनवी वर्तमानपत्रे निघतात आणि चालतात त्यामागे विस्तारणारी प्रादेशिक बाजारपेठ हेच कारण आहे.

नव्या बाजारपेठेकडे कूच

देशातील जवळजवळ २८० दशलक्ष साक्षर वर्तमानपत्रे वाचत नाहीत. आज देशातील ५३ टक्के वाचक हा ग्रामीण वाचक आहे. या वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक बाजारपेठेमध्ये असलेल्या संधी आता वृत्तपत्रचालकांच्याही लक्षात येऊ लागल्या आहेत, त्यामुळेच मोठमोठे वृत्तपत्रसमूह आज छोट्या छोट्या ग्राहकक्षेत्रामध्ये पाय रोवण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रे ताब्यात घेऊन आपल्या प्रचंड नेटवर्कचा लाभ त्यांना मिळवून देऊन आक्रमक मार्केटिंगद्वारे आणि खपवाढीच्या नवनव्या क्लृप्त्या वापरून त्या बाजारपेठा काबीज करण्यामागे लागल्या आहेत. देशातील आघाडीच्या वृत्तपत्रसमूहांनी देशी भाषांतील अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रे ताब्यात घेऊन आपल्या समूहाच्या पंखांखाली आणलेली आपल्याला दिसतील. त्यांना त्यांनी आधुनिक रूप दिलेले आहे. आकर्षकता आणली आहे. ‘जागरण’ समूहाने मध्य प्रदेशातील हिंदी दैनिक ‘नई दुनिया’ दीडशे कोटींना विकत घेतले, टाइम्स समूहाने बंगालमध्ये ‘ई समय’ सुरू केले, ‘नवभारत टाइम्स’ ने लखनौमध्ये एक लाख प्रतींंसह पाय रोवले अशा बातम्या अलीकडे सातत्याने कानी पडत आहेत आणि यापुढील काळातही ऐकू येणार आहेत. जाहिरातदारांनाही या नव्या ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये पाय रोवण्यासाठी ही वर्तमानपत्रे त्यामुळे उपलब्ध झाली आहेत.

वाढता माध्यम व मनोरंजन उद्योग

भारताच्या एकंदर माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राची उलाढाल गेल्या वर्षी म्हणजे सन २०१२ मध्ये ८२०.५ अब्ज रुपयांची होती. सन २०११ च्या तुलनेत ती १२.६ टक्के वाढली. या वर्षी सन २०१३ मध्ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राची एकूण उलाढाल ९१७.४ अब्ज रुपये असेल असे अनुमान आहे. सन २०१७ पर्यंत भारताचा माध्यम आणि मनोरंजन उद्योग १६६१.१ अब्ज रुपयांवर जाऊन पोहोचेल असा अंदाज आहे. दरवर्षी त्यात सरासरी १५.२ टक्के वाढ होत जाईल असे मानले जात आहे. माध्यम आणि मनोरंजन उद्योग असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यात मनोरंजनाच्या सर्व माध्यमांचा समावेश होतो. अगदी सिनेमापासून टीव्ही, नियतकालिके, एफ एम रेडिओ, संगीत, इंटरनेट आणि गेमिंग आणि ऍनिमेशनपर्यंत सर्व बाबी त्यात जमेस धरल्या जातात. या प्रत्येक क्षेत्रातील आर्थिक उलाढालीकडे पाहून त्या क्षेत्राच्या विकासाची गती मोजली जाते. या विश्लेषणानुसार भारतामध्ये सिनेमाप्रमाणेच इंटरनेटचा वेगाने विस्तार होत चाललेला आहे. इंटरनेटवर स्वार होऊनच नवनवी माध्यमे जगाच्या स्वारीवर निघाली आहेत हे येथे लक्षात घ्या.

जाहिराती मुद्रित माध्यमांकडेच

मुद्रित माध्यमांसाठी दिलासादायक बाब एवढीच की भारतामध्ये जाहिरातींवर खर्च होणार्‍या एकूण महसुलाचा जर विचार केला, तर त्यामध्ये अद्यापही मुद्रित माध्यमांचाच वरचष्मा कायम आहे. म्हणजे ‘फिक्की - केपीएमजी मीडिया अँड एंटरटेनमेंट २०१३’ अहवाल विचारात घेतला, तर सन २०१२ मध्ये विविध माध्यमांतील जाहिरातींवर जाहिरातदारांनी एकूण ३२७.४ अब्ज रुपये खर्च केले. जाहिरातींवरील खर्चांमध्ये गेली काही वर्षे सातत्याने घट मात्र दिसते आहे. सन २०१० मध्ये जाहिरातींद्वारे मिळणारा महसूल १७ टक्क्यांनी वाढला होता. २०११ मध्ये तो १३ टक्क्यांवर आला आणि २०१२ मध्ये जाहिरात महसुलात केवळ नऊ टक्के वाढ झाली. पण दिलाशाची बाब म्हणजे जाहिरातींवरील एकूण खर्चापैकी जवळजवळ ४६ टक्के वाटा हा मुद्रित माध्यमांच्या, वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांच्या पदरी पडला आहे. म्हणजे सन २०१२ मध्ये भारतात जाहिरातींवर जे ३२७.४ अब्ज रुपये खर्च केले गेले, त्यापैकी दीडशे अब्ज रूपये हे वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यांच्या पदरात पडले आहेत. मुद्रित माध्यमे असो किंवा दूरचित्रवाणी माध्यम असो, देशी भाषांतील प्रादेशिक माध्यमांना याचा सर्वाधिक लाभ मिळालेला दिसतो. मोठमोठ्या समूहांना छोट्या प्रादेशिक प्रसारमाध्यमांचा ताबा मिळवण्याची घाई का लागली आहे त्याचे उत्तर आपल्याला येथे मिळेल.

इंटरनेटचा वाढता प्रसार

एकीकडे प्रादेशिक माध्यमांमध्ये असे आशादायक चित्र दिसत असताना दुसरीकडे भारतातील वाढत्या इंटरनेट पेनिट्रिशनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. इंटरनेटचा विस्तार वाढत चालला आहे. ब्रॉडबँड इंटरनेट सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. मोबाईल स्मार्टफोन आणि टॅब्लेटची मागणी प्रचंड वाढलेली आहे. संगणकांपेक्षाही टॅब्लेटला असलेली वाढती मागणी या स्थित्यंतराचा प्रत्यय देते. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (मॅट) ने आपल्या अहवालात यंदा टॅब्लेटची विक्री गतवर्षीपेक्षा दुप्पट होईल असा अंदाज वर्तवला आहे. या आर्थिक वर्षात ३.८४ दशलक्ष टॅब्लेटस् विकल्या जातील असे त्यांचे अनुमान आहे. जागतिक स्तरावर तर संगणकांपेक्षा टॅब्लेटस्‌चा प्रसार प्रचंड वेगाने होताना दिसू लागला आहे. ‘गार्टनर’ या मार्केट रीसर्च संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर यंदा संगणकाचा खप ८ टक्क्यांनी घटला, तर टॅब्लेटस्‌ची विक्री मात्र ७० टक्क्यांनी वाढली आहे. स्मार्टफोन किंवा टॅब्लेटची खरी मजा चाखायची असेल तर त्यावर इंटरनेट जोडणी ही आवश्यक असते. त्यामुळे अशा इंटरनेटयुक्त उपकरणांच्या वाढत्या संख्येचा आणि त्यावरील ऍप्सद्वारे आपली इतर कामे करता करता रोजच्या बातम्या बघण्याच्या वाढत्या सवयीचा परिणाम हळूहळू आपल्या पारंपरिक माध्यमांवर होणारच आहे. पाश्‍चात्त्य जगतामध्ये आज जे घडते आहे, ते लोण आपल्यापर्यंत यायला कदाचित आणखी काही वर्षे लागतील, परंतु कन्व्हर्जन्स हा या बदलत्या युगाचा परवलीचा शब्द आहे हे विसरून चालणार नाही.
भारतामध्ये आज १३ कोटी ७० लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी आहे. एकूण लोकसंख्येच्या ११.४ टक्के असे हे प्रमाण आहे. दरवर्षी सरासरी २७.५ टक्के वेगाने इंटरनेटचा विस्तार वाढत चालला आहे. मनोरंजनाच्या इतर माध्यमांपेक्षा हा वेग अधिक आहे. सन २०१७ पर्यंत देशात ३८६ दशलक्ष घरांपर्यंत म्हणजे ३८ कोटी घरांमध्ये इंटरनेट पोहोचलेले असेल. इंटरनेटयुक्त स्मार्टफोन्सची देशातील संख्या सन २०१२ मध्ये ३८ दशलक्ष होती, ती सन २०१७ मध्ये २४१ दशलक्षांवर जाईल असा अंदाज आहे. ही संख्या त्याहून मोठी असू शकते.  जगामध्ये मोबाईलवर इंटरनेट वापरणार्‍यांच्या संख्येत ६०.३ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे आणि येत्या दोन वर्षांत ही संख्या ८१८.४ दशलक्षांवर पोहोचेल असा अंदाज आहे.

डिजिटल क्रांतीत गोवा आघाडीवर

२०११ च्या जनगणनेनुसार आपल्या गोव्यामध्ये १८ टक्के घरांत इंटरनेट पोहोचलेले आहे. गोव्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक आहे. येथील ९७ टक्के घरांमध्ये वीज पोहोचलेली आहे. ८९ टक्के घरांमध्ये फोन आहे आणि ८१ टक्के घरांमध्ये टीव्ही आहे. साक्षरतेचे प्रमाण तर ८७.४० टक्के आहे. ही सगळी प्रगती विचारात घेतली, तर भारतामधील डिजिटल क्रांतीचे आगमन हे गोव्यातूनच होईल असा विश्वास बाळगायला हरकत नसावी. ऑप्टिकल फायबरचे राज्यभर पसरलेले जाळे, त्याद्वारे यशस्वीरीत्या चालवल्या जाणार्‍या वृत्तवाहिन्या, आयपीटीव्हीसारख्या तंत्रज्ञानाचे गोव्यात झालेले आगमन, स्मार्टफोन्स आणि टॅब्लेटस्‌ची वाढती विक्री, शालेय स्तरावर राबवल्या जाणार्‍या ‘सायबर एज’ सारख्या योजनेंतून आलेली संगणक साक्षरता या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर हा विश्वास अनाठायी नाही हे लक्षात येईल. नेटिझन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यांच्या बदललेल्या सवयी पारंपरिक प्रसारमाध्यमांना विचारात घ्याव्याच लागतील.

सोशल मीडियाचे युग

गेल्या काही वर्षांत जगामध्ये प्रचंड खळबळ माजवली आहे ती सोशल मीडियाने. सोशल मीडिया ही इंटरनेटवरील क्रमांक एकची ऍक्टिव्हिटी आहे. जगातील सर्वाधिक लोक आज इंटरनेटचा वापर माहिती मिळवण्यापेक्षा किंवा ई - कॉमर्सपेक्षाही सोशल नेटवर्किंगसाठी करतात असा त्याचा अर्थ आहे. फेसबुक, गुगल प्लस, ट्वीटर, यूट्यूब यांची लोकप्रियता अक्षरशः अफाट म्हणावी अशीच आहे.
फेसबुक युजर्सची संख्या जगामध्ये ८४५ दशलक्षांवर म्हणजे साडे चौर्‍याऐंशी कोटींवर पोहोचली आहे. ७५१ दशलक्ष मोबाईलधारक आपल्या मोबाईलवरील ऍपद्वारे फेसबुक वापरतात. म्हणजे जगातील अनेक राष्ट्रांच्या लोकसंख्येहूनही ही संख्या अधिक आहे. ज्यांना फेसबुकचे व्यसनच जडले आहे अशा म्हणजे ‘फेसबुक ऍडिक्शन सिंड्रोम’ असलेल्या युजर्सची संख्या ३५ कोटींहून अधिक आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात एकूण वेब युजर्सपैकी तब्बल ७२.२ टक्के लोक फेसबुकवर आहेत आणि ५७ टक्के लोक फेसबुकद्वारेच मित्रांशी संवाद साधणे पसंत करतात. प्रत्येक फेसबुक युजरचे सरासरी १३० फेसबुक फ्रेंडस् आहेत आणि सरासरी प्रत्येक युजर फेसबुकवर १२ मिनिटे घालवीत असतो. लेडी गागाचे ३ कोटी ८ लाख २१ हजार ५६८ फॉलोअर्स आहेत!

‘लाईव्ह’चे आकर्षण

आज टीव्ही, न्यूज पोर्टल्स, न्यूज आणि सोशल नेटवर्किंग ऍप्स आदींना वर्तमानपत्रांपेक्षा एका बाबतीत आघाडी घेता येते ती म्हणजे तात्काळ आपल्या श्रोत्यापर्यंत पोहोचण्याची त्यांची क्षमता. वर्तमानपत्रांपेक्षा प्रत्यक्ष आपल्या श्रोत्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही ‘टाइम गॅप’ कमी असल्याने घडलेली घटना लगोलग तिच्या सर्व अंगोपांगांनी आपल्या श्रोत्यापर्यंत पोहोचवणे त्यांना सहजशक्य होते. मग आधल्या दिवशी घडलेली आणि टीव्हीवर प्रत्यक्ष पाहिलेली बातमी दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात छापून येईपर्यंत बरेच काही घडून गेलेले असते. तरीही वाचक वर्तमानपत्र वाचतो कारण तो त्याच्या सवयीचा भाग झालेला आहे आणि वर्तमानपत्रांवर, छापील शब्दांवर त्याचा आजही दृढ विश्वास आहे. ही टाईम गॅप लक्षात घेऊन बहुतेक वर्तमानपत्रांनी आपल्या वाचकाला टिकवण्यासाठी वेबसाईटस् आणि फेसबुक पेजेस् खुल्या केलेल्या आहेत आणि त्यावर तात्काळ अपडेटस् देण्यास सुरूवात केलेली आहे. वर ज्या कन्व्हर्जन्सचा उल्लेख झाला, त्याचा प्रारंभ झालेला आहे. एखाद्या छापील बातमीसंबंधीचे ऑडिओ - व्हिडिओ, अधिक सविस्तर व पूरक मजकूर ऑनलाईन देण्यास सुरूवात झालेली आहे.

फेसबुकिस्तान, ट्वीटरीस्तान!

फेसबुकची ताकद काय असू शकते हे अलीकडेच काही देशांमध्ये झालेल्या उठावांतून पुरेपूर दिसून आले आहे. फेसबुकद्वारे राज्यक्रांती जशी घडू शकते, तशीच बंगलुरूमध्ये ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांची फेसबुकवरील अफवांमुळे जी पळापळ झाली तसे प्रकारही होऊ शकतात.  ट्वीटरवर जगातील पाचशे दशलक्ष म्हणजे पन्नास कोटी लोक आहेत. जून २०१२ ते मार्च २०१३ या काळात ट्वीटर वापरणार्‍यांच्या संख्येत ४४ टक्के वाढ दिसून आली आहे. जगातील नेटिझन्सपैकी २१ टक्के लोक ट्वीटर वापरतात. यूट्यूबवर पाचशे दशलक्ष युजर आहेत. दर सेकंदाला त्यावर जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपर्‍यातून सरासरी एका तासाचे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि दरमहा सहा अब्ज तास व्हिडिओ पाहिले जातात. गुगल प्लसशी रोज ९ लाख २५ हजार नवे युजर जोडले जात आहेत. लिंक्ड इन वर २०० देशांतील २६ लाख कंपन्यांची खाती आहेत. हा सगळा तपशील या नव्या युगाच्या नव्या संवाद माध्यमाचा विस्तार आणि नव्या पिढीवरील प्रभाव स्पष्ट करण्यास पुरेसा असावा. सोशल मीडियामध्ये वायफळ गोष्टींवर प्रचंड कालापव्यय केला जातो आणि या माध्यमाची खरी ताकद वापरलीच जात नाही हे जरी खरे असले, तरी जनमत घडवण्यात हे माध्यम मुद्रित वा टीव्हीसारख्या माध्यमाच्या तोडीस तोड योगदान देऊ शकेल हे लक्षात ठेवावे लागेल. म्हणूनच तर भारत सरकारने माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत या नव्या माध्यमांद्वारे आपल्या प्रचार मोहिमा राबवण्यासाठी एक विभाग नुकताच स्थापन केला आहे.

सोशल मीडियावर बंधने

या माध्यमांचा प्रचारकी गैरवापरही वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे भारतामध्येही फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमाची ताकद आज राजकारण्यांना भेडसावू लागली आहे. म्हणूनच या माध्यमावर लगाम कसण्याचे प्रयत्न कसोशीने सुरू झालेले दिसतात. सोशल मीडियाच्या  प्रचंड ताकदीमुळे जगभरच्या राजसत्ता अस्वस्थ झालेल्या दिसतात. या माध्यमावर निर्बंध आणण्याचा विचार सर्वत्र सुरू आहे आणि त्या दिशेने पावलेही उचलली जात आहेत.
नुकत्याच झालेल्या ‘एक्स्प्रेस’ समूहाच्या स्व. रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नालिझम चर्चासत्रात याच विषयावर उद्बोधक चर्चा झाली. सोशल मीडिया हे सर्वसामान्यांच्या सशक्तीकरणाचे जसे प्रभावी साधन आहे, तसेच ते पूर्वग्रहदूषित प्रचारातून अराजकालाही तोंड फोडू शकते. ते जसे विधायक आहे, तसेच विघातकही ठरू शकते असा एकंदर या चर्चेचा सूर होता. आज इंटरनेट ही जगातील सर्वांत व्यापक शासनमुक्त अशी जागा आहे आणि म्हणूनच तिच्यावर निर्बंध जरी लादणे योग्य नसले तरी काही नेमनियम असले पाहिजेत यावर सहभागींचे त्यात एकमत दिसले. या नव्या माध्यमांनी पारंपरिक माध्यमांना कितपत आव्हान उभे केले आहे या प्रश्नावर ‘इंडिया टुडे’ चे अरुण पुरी यांनी पारंपरिक माध्यमांसाठी सोशल मीडिया ही एक मोठी संधी असल्याचे मत व्यक्त केले. ते जर योग्यप्रकारे वापरले गेले, तर त्याद्वारे आपल्या माध्यमाचे प्रवर्धन करता येईल, आपल्या वाचकाशी दुहेरी संवाद प्रस्थापित करता येईल आणि आज वाचकाला नेमके काय हवे आहे ते जाणून घेता येईल असे पुरी यांचे म्हणणे होते.

वाचकाशी दुहेरी संवाद

झपाट्याने उदयास आलेल्या सोशल मीडियामध्ये चाललेला संवाद एकतर्फी नाही. तो दुहेरी संवाद आहे. त्यामुळे आपल्या वाचकाला एकतर्फी मजकूर न देता त्याच्या आवडीनिवडी, त्याची प्राधान्ये समजून घेऊन आणि त्याच्या म्हणण्याला महत्त्व देऊनच माध्यमांना पुढे जावे लागणार आहे.  वाचकांचा प्रतिसाद आजमावून त्याच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे ही वाचक टिकवण्याच्या दृष्टीने आजची मोठी गरज आहे. शेवटी वृत्तपत्र हे वर्तमानाशी संबंधित असते. वर्तमानासोबतच त्यांना राहावे लागेल. वाचकाला गृहित धरण्याचे दिवस कधीच संपले आहेत. आजचा वाचक हा ‘वेल इन्फॉर्म्ड’ आहे. त्याला माहिती आणि ज्ञानाचे इतर अनेक पर्याय आज सहज उपलब्ध आहेत. अनेक स्त्रोतांतून त्याच्याकडे अद्ययावत माहिती पोहोचत असते. वाचकानुनय करण्याच्या नादात वृत्तपत्रांचे गांभीर्य हरवत जाण्याची भीतीही निर्माण झालेली आहे. खप आणि दर्जा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे ‘लोकप्रिय’ असते ते ‘अभिजात’ असतेच असे नाही. पण जाहिरातींद्वारे खोर्‍याने पैसा कमावण्यासाठी काहीही करून खपाचे आकडे वाढवण्याची आज बहुतेक व्यवस्थापने धडपडताना दिसतात.

ओरडणार्‍याचा माल खपतो

मार्केटिंग हा आज वृत्तपत्र व्यवसायाचा मूलमंत्र बनला आहे. आपला वाचक टिकवून ठेवण्यासाठी अधिकाधिक पाने, अधिकाधिक पुरवण्या, कमीत कमी कव्हर प्राईस, भेटवस्तू, वर्गणीदार योजना, कूपन योजना, नानाविध कार्यक्रम - उपक्रम यांचा आधार घेतला जाऊ लागला आहे. ओरडणार्‍याचा माल खपतो हे तत्त्व स्वीकारून तवे, बादल्या, टिफीन अशा भेटवस्तूंचे गळ घेऊन वृत्तपत्रचालक बाजारात बसू लागले आहेत.  वृत्तपत्रांचे बदललेले अर्थकारण याला कारणीभूत आहे. ‘टिळकांची पत्रकारिता आज राहिली नाही हो’ म्हणून गळा काढणार्‍यांना वर्तमानपत्र व्यवसायाचे हे बदललेले स्वरूप आणि त्याचे अर्थकारण समजून घ्यावेसे वाटत नाही. आजच्या वृत्तपत्रांवर टीका करणे ही फॅशन बनली आहे.
अर्थात, आर्थिक कारणे पुढे करून या क्षेत्रात काहींनी वृत्तपत्रांतून जो ‘जागाविक्रय’सुरू केला आहे, तो मुळीच समर्थनीय नाही. पेड न्यूज, कॉर्पोरेटस्‌बरोबरचे समझोता करार, एडव्हर्टोरियल्स असल्या प्रकारांनी पत्रकारितेची प्रतिष्ठा आज वेशीवर टांगली आहे.

वैचारिकतेला रामराम

माध्यमांची प्राधान्ये काळासरशी बदलत चालली आहेत. बदलत्या काळाप्रमाणे अनेक बदल बातम्यांच्या स्वरूपातून दिसून येतील. हार्ड न्यूजपेक्षा सॉफ्ट न्यूज, ऑड न्यूज, ह्यूमन इंटरेस्ट फीचर्सकडे, हलक्या फुलक्या चटपटीत मजकुराकडे वर्तमानपत्रांचा आणि वृत्तवाहिन्यांचाही कल वाढू लागला आहे. मर्डोक संस्कृती आज जगभरच्या प्रसारमाध्यमांतून रुजली आहे. टू इन्फॉर्म, टू एज्युकेट अँड टू एंटरटेन ही पत्रकारितेची त्रिसूत्री मानली जाते. परंतु इन्फॉर्म आणि एंटरटेन हेच जीवितध्येय बनत चालले आहे आणि या इन्फोटेनमेंटमध्ये बदलता वाचकही अधिक रस घेऊ लागला आहे. प्रबोधनाची परंपरा क्षीण झाली आहे हेही मान्य करावेच लागेल. वैचारिकतेला रामराम ठोकून गुन्हेगारी आणि नकारात्मक गोष्टींना अधिक प्राधान्य मिळू लागले आहे. या सर्वांचे कारण पत्रकारितेत येऊ लागलेली अर्धकच्ची, अप्रशिक्षित पत्रकार मंडळीही आहेत. पत्रकारितेच्या उर्जस्वल परंपरेचा पत्ता नसलेल्या या पोटभरू पत्रकारितेतील हे सारे निराशाजनक पर्व या क्षेत्राच्या भवितव्याबाबत मनात विलक्षण अस्वस्थता निर्माण करते.

वृत्तवाहिन्यांनी संधी घालवली

आज आपल्या देशात आठशे दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. वृत्तवाहिन्यांची संख्याही त्यात लक्षणीय आहे. परंतु फुटकळ विषयांवरचे टॉक शो, वृत्तमूल्य नसलेल्या क्षुल्लक बातम्यांची अतिरंजित स्वरूपातील प्रस्तुती आणि जाहिरातींचे प्रचंड प्रमाण यामुळे या वृत्तवाहिन्या आपले गांभीर्य आणि जनमानसावरील पगडा हरवू लागल्या आहेत हेही आपल्या लक्षात येईल. एखादी घटना लगोलग आणि थेट दाखवण्याचे विलक्षण सामर्थ्य या माध्यमापाशी आहे, परंतु प्रत्यक्ष फील्डवरील वार्तांकनापेक्षा स्टुडिओत बसून त्याच त्याच बोलक्या पोपटांना सोबत घेऊन चाललेल्या चर्चांमध्ये अधिक वेळ घालवला जाऊ लागला आहे. आपणच न्यायनिवाडा करायला बसलो आहोत या थाटात पूर्वग्रहदूषित मीडिया ट्रायल चालवल्या जात आहेत. बातम्यांच्या सनसनाटीकरणाचा सोस विश्वासार्हतेचा बळी घेऊ लागला आहे. वस्तुस्थिती समजून न घेता अपुर्‍या माहितीच्या आधारे ढोल पिटले जात आहेत. जनमानसावर प्रभाव टाकण्याची हाती असलेली संधी या मंडळींनी असल्या सवंग गोष्टींनी वाया घालवली आहे. माध्यमांच्या विश्वासार्हतेचीही आज कसोटी आहे. सनसनाटी, एकतर्फी बातम्या, मालकवर्गाचे राजकीय आणि व्यावसायिक हित जपणार्‍या पेरीव बातम्या यातून विश्वासार्हता लयाला चालली आहे.

माध्यमसमूहांची मक्तेदारी

वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या राजकारण्यांची तळी उचलून धरतात की सर्वसामान्य माणसाची? देशातील बहुतेक प्रसारमाध्यमे राजकारणी आणि त्यांचे पित्ते यांच्या हाती गेलेली आहेत. राज्याराज्यांमध्ये हे राजकारण्यांशी लागेबांधे असलेले वृत्तपत्रसमूह आणि वृत्तवाहिन्या यांनी जम बसवला आहे. माध्यम विश्वामध्ये आज मक्तेदारी वाढत चाललेली दिसते. प्रचंड ताकदवान प्रसारमाध्यम समूह आकाराला येऊ लागले आहेत.
२००४ साली बेन बॅग्डिनियनने जेव्हा ‘द न्यू मीडिया मोनोपॉली’ नावाचे पुस्तक लिहिले तेव्हा त्याने त्यात प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातील ‘बिग फाईव्ह’ चा उल्लेख केला होता. वॉल्ट डिस्ने कंपनी, टाइम वॉर्नर, रूपर्ट मर्डोकचे न्यूजकॉर्प, वायकॉम अशांचे माध्यम जगतातील वाढत्या प्राबल्यातील धोके त्यामुळे प्रकर्षाने पुढे आले. ब्रिटनमध्ये रूपर्ट मर्डोकने आपले जागतिक माध्यम साम्राज्य उभारले, त्यातून काय घडले, वृत्तमूल्ये कशी बदलली ते जगापुढे आहेच. आज भारतही अशाच माध्यमसम्राटांच्या अधिपत्याखाली आलेला आहे आणि असंख्य आवृत्त्यांनिशी एकाचवेळी देशाच्या कानाकोपर्‍यातून निघणारी बडी वृत्तपत्रे, राष्ट्रीय आणि प्रादेशिक मनोरंजन व वृत्तवाहिन्यांची साखळी, त्यांचे वितरण करणारी केबल व डीश नेटवर्क, शहराशहरांतून काढलेल्या एफएम रेडिओ वाहिन्या, या सार्‍यांचा मिलाफ घडवणारी चित्ताकर्षक वेब पोर्टल्स अशी साम्राज्ये प्रस्थापित होऊ लागली आहेत. आपल्याला हवे तसे जनमतही घडवू लागली आहेत. वृत्तपत्रे, टीव्ही, एफ एम रेडिओ, इंटरनेट पोर्टल, केबल व डीश नेटवर्क अशा सर्व माध्यमांची सूत्रे एखाद्या समूहाच्या हाती जाणे हे लोकशाहीला घातक आहे असा विचार त्यामुळे आज भारतातही पुढे आलेला आहे आणि सरकारकडून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) च्या माध्यमातून अशा प्रकारच्या मीडिया क्रॉस - होल्डिंग्सला पायबंद घालण्याच्या हालचाली गांभीर्याने सुरू झाल्या आहेत. ‘रिलायन्स’ सारख्या समूहाने जेव्हा ई - टीव्ही आणि टीव्ही १८ समूहामध्ये गुंतागुंतीची गुंतवणूक केली तेव्हा या विषयाचे गांभीर्य देशाला कळून चुकले. पाश्‍चात्त्य जगतामध्ये अशा माध्यम मक्तेदारीचे धोके पुरेपूर कळून चुकले आहेत. त्या दिशेने कायदेही झाले आहेत. आपल्याकडेही सध्या यासंबंधी विचारमंथन सुरू आहे. मतभिन्नता आणि मतबाहुल्य हा लोकशाहीचा प्राण आहे आणि माध्यमांच्या मक्तेदारीतून त्यालाच धोका पोहोचतो असा त्या मंडळींचा युक्तिवाद आहे.

थेट विदेशी गुंतवणुकीच्या दिशेने

देशातील अनेक क्षेत्रे आज थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) खुली करण्यात आली आहेत, मग माध्यम क्षेत्रालाच का खुले केले जाऊ नये असा विचार मालकवर्गाकडून जोरकसपणे मांडला जाऊ लागला आहे. भारतीय वृत्तपत्रमालकांची प्रातिनिधिक संघटना असलेल्या इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) ने मुद्रित माध्यमांमध्ये ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणूक करू द्यावी अशी भूमिका घेतली आहे. मल्याळम मनोरमा, मातृभूमी आदी समूहांनी याला विरोध दर्शविला असला, तरी इतर आघाडीच्या वृत्तपत्रसमूहांचा सरकारला तसा आग्रह आहे. मात्र, विदेशी गुंतवणुकीत वाढ करणे याचाच अर्थ या माध्यमांचे संपादकीय नियंत्रण भारतीयांच्या हातातून निसटणे असा होत असल्याने गृह मंत्रालय माध्यम क्षेत्र थेट विदेशी गुंतवणुकीस खुले करायला तयार नाही. नुकतेच तसे निवेदन वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी राज्यसभेत दिले आहे. परंतु विमा, संरक्षण असे एकेक क्षेत्र थेट विदेशी गुंतवणुकीस खुले होत चालले असताना आणि खुद्द माध्यम क्षेत्रातील ‘कॅरिएज’ (म्हणजे डीटीएच, केबल सारखे वाहक) मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीस सरकारने यापूर्वीच अनुमती दिलेली असताना प्रसारमाध्यमांना मात्र सरकारने वेगळा न्याय लावलेला दिसतो. ही चिंता राष्ट्रहिताची की विदेशी गुंतवणूक आली तर माध्यमे स्वायत्त होऊन आपल्याला जुमानणार नाहीत याची हे राजकारण्यांनाच ठाऊक! जागतिकीकरणाच्या युगात किती काळ आपण हे क्षेत्र विदेशी गुंतवणुकीपासून थोपवून ठेवू शकू हाही प्रश्न आहेच.


वाचकही बदललेला

आपल्या भोवतीचा समाज बदलला, त्याच्या आवडीनिवडी बदलल्या, धारणा बदलल्या, मूल्ये बदलली, अभिरुची बदलली, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वातावरण बदलले. या सगळ्याचे प्रतिबिंब आजच्या प्रसारमाध्यमांतून उमटताना दिसते आहे. आजवर अनेक आव्हानांचा सामना करीत प्रसारमाध्यमांनी येथवर मजल मारली. भविष्याचा विचार करता येणारी आव्हाने अधिक कठीण असतील हे तर दिसतेच आहे. काळ कोणासाठी थांबत नसतो आणि प्रसारमाध्यमांची नाळ तर ‘वर्तमाना’शी जुळलेली आहे. त्यामुळे बदलत्या काळासरशी या क्षेत्रातही बदल अपरिहार्य आहेत. पण या सार्‍या खटाटोपाच्या मुळाशी आहे तो सामान्य माणूस. या देशातील अडलेल्या नडलेल्या, खचलेल्या पिचलेल्या सर्वसामान्य माणसाला आधार आहे तो प्रसारमाध्यमांचा. त्याच्याकडे तो विश्वासाने आणि आशेने पाहतो आहे. आपला आवाज बुलंद करणारे कोणी तरी आहे हा त्याचा विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आणि आजच्या व्यावसायिक कालखंडातही पूर्वसुरींनी घालून दिलेल्या पत्रकारितेच्या उर्जस्वल परंपरेला तिलांजली द्यायची नाही एवढे भान जरी प्रसारमाध्यमांमध्ये वावरणार्‍या प्रत्येकाने ठेवले तरी पुरेसे आहे. काळ बदलेल. वाचक बदलेल. तंत्रज्ञान बदलेल. माध्यमेही बदलतील. बदलणार नाहीत ती पत्रकारितेची मूलतत्त्वे! त्यांच्याशी बांधीलकी राखणे हेच आजचे सर्वांत मोठे आव्हान आहे. सुदैवाने ही बांधीलकी असलेले पत्रकार आजही मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणूनच पत्रकारितेची प्रतिष्ठा टिकून आहे. आपला आब राखून आहे.



ही तर अस्तित्वाचीच लढाई



आक्रमक मार्केटिंगमुळे वृत्तपत्रे किमती वाढवत नाहीत आणि ग्राहकाची मानसिकताही स्वस्त वृत्तपत्रे मिळावित अशी झाली आहे. साबण, पेस्ट इतकेच काय बीअरप्रमाणे वृत्तपत्रांचे वितरण व मार्केटिंग केले जात आहे. ज्याची मार्केटिंग स्कीम चालू असेल ती पेस्ट किंवा तो चहाचा पुडा घ्यायचा ही वाचकांची किंवा ग्राहकांची सवय बनू पाहात आहे. चकचकीत, रंगीत पुरवण्या काढणे हे परवडत नसले तरी गरज बनले आहे.



- शरद कारखानीस,

ज्येष्ठ पत्रकार

मराठी वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप हा खूप व्यापक विषय आहे, कारण त्याची सुरुवात ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या बाळशास्त्री जांभेकर यांच्या पहिल्या मराठी वर्तमानपत्रापासून होते आणि त्याला शेवट किंवा समाप्ती नाही. आज प्रकाशित होणारी संख्येने भाराभर वृत्तपत्रेही येथे विचारात घ्यावी लागतील. गेल्या १८० वर्षांचा आणि त्यातून चाललेल्या व आज अस्तित्वात नसलेल्या अशा हजारभर नियतकालिकांचा सर्वसाधारण आढावा घ्यावा लागेल. अर्थात यातील तपशिलाला ङ्गाटा देऊन बदलाचे सूत्र, प्रवास आणि स्वरूप याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.
बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या ‘दर्पण’ च्या पहिल्या अग्रलेखात वर्तमानपत्र काढण्यामागील भूमिका स्पष्ट केली होती. ‘मनोरंजन करणे, चालते काळाचे वर्तमान कळविणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टींची ‘दर्पण’ छापणार्‍यास मोठी उत्कंठा आहे’ अशी त्रिसूत्री बाळशास्त्रींनी सांगितली आहे. दर्पणकारांचा द्रष्टेपणा यातून दिसून येतो. कारण ‘वर्तमान कळविणे’ म्हणजे बातम्या देणे हे तर वृत्तपत्रांचे प्रमुख काम आहेच, पण त्याबरोबर ‘मनोरंजन करणे’ हेही वृत्तपत्रांचे एक काम असले पाहिजे असे ते म्हणतात. यातील तिसरा भाग ‘योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे’ म्हणजे उद्योग, व्यवसाय, नोकरी - धंदा यामध्ये यश मिळविणे होय. या दृष्टीने वृत्तपत्रांनी मार्गदर्शन करावे हे बाळशास्त्रींनी आपले कार्य मानले आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर वृत्तपत्रांनी ‘करिअर गायडन्स’ द्यावे असे हे काम आहे. म्हणजेच मराठीतील आद्य वृत्तपत्रकाराला वृत्तपत्राच्या स्वरूपाविषयीची निश्‍चित दिशा ठाऊक होती. बंगाल या भारताच्या एका प्रदेशात पूर्वी बलात्कार, अत्याचार, कुनीतीची कृत्ये घडत होती. त्या प्रदेशाला इंग्रजी अमलाखाली आल्यावर ७० वर्षांतच बदलता आले आणि आता हा प्रदेश निर्भयपणे स्वातंत्र्य उपभोगत आहे असेही बाळशास्त्रींनी या पहिल्या अग्रलेखात म्हटले आहे. तेथे इंग्रजी भाषा आणि भाषिक वृत्तपत्रे यांचा प्रसार झाल्यामुळे आश्‍चर्यकारक परिवर्तन झाले असे ते म्हणतात.
हा सारा काळ १८३० ते ४० दरम्यानचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी सत्ता यांनी भारलेली ती पिढी होती आणि इंग्रज आल्यामुळे आपल्या देशाचा आणि आपला अभ्युदय होत आहे हीच त्यांची भावना होती. ‘दर्पण’ हे मराठी व इंग्रजी असे द्विभाषिक वृत्तपत्र होते. एका स्तंभात मराठी मजकूर, तर बाजूच्या तेवढ्याच स्तंभात त्या मजकुराचे इंग्रजी भाषांतर असा हा अवतार होता. मराठी वाचकांप्रमाणे इंग्रज अधिकार्‍यांनीही ‘दर्पण’ डोळ्यांखालून घालावे इतकेच नव्हे तर साहेबलोकांनी इंग्रजी विद्या, कला याबद्दल लिहून पाठविले तर तेही त्यामध्ये छापले जाईल असे बाळशास्त्री म्हणतात.

‘केसरी’ चे पर्व

४ जानेवारी १८८१ म्हणजे पुढे ४९ वर्षांनी ‘केसरी’ हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले. त्यावेळी आपली भूमिका संपादक म्हणून आगरकरांनी मांडली आहे. अलीकडे कोणीही उठून वर्तमानपत्र काढतो, पण आपण लोककल्याणाच्या हेतूने ‘केसरी’ काढत आहोत असे प्रारंभी ते म्हणतात. याचाच अर्थ बाळशास्त्रींच्या नंतरच्या ४०-५० वर्षांत वृत्तपत्रांचा गावोगावी बर्‍यापैकी प्रसार झाला असा आहे. ‘रस्तोरस्ती दिवे लागले असल्याने व पोलिसांची गस्त सारखी ङ्गिरत असल्याने जो उपयोग होत असतो तोच ज्या त्या जागी वर्तमानकर्त्याची लेखणी सदोदित चालू असल्याने होत असतो. म्हणजे एक तर समाजात जागृतीचे दिवे लावणे आणि पोलिसाप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईचा एक दबदबा तयार करणे हे ‘केसरी’कारांनी आपले काम मानले. सरकारी कारभाराला दिशा देणे आणि त्यामधील गैरप्रकार उघड करणे हेही काम आपण करणार आहोत अशी ग्वाही या पहिल्या धोरणविषयक अग्रलेखात त्यांनी दिली आहे. याचा अर्थ असा आहे की, इंग्रजी अमलावर घणाघाती टीका करणे किंवा राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे हे प्रारंभी तरी ‘केसरी’ला अभिप्रेत नव्हते. टिळक जसे राजकारणात तळपू लागले आणि ‘लोकमान्य’ झाले तसे ‘केसरी’ चे स्वरूप हे बदलत गेले आणि नंतर ते स्वातंत्र्याच्या लढ्याचे मुखपत्र झाले.

‘सुधारकी’ पत्रकारिता

‘केसरी’चे हे बदलते स्वरूप सामाजिक सुधारणांना महत्त्व देणार्‍या गोपाळ गणेश आगरकरांना मान्य होणारे नव्हते. त्यामुळे ते तेथून बाहेर पडले आणि ‘सुधारक’ हे नवे वृत्तपत्र त्यांनी काढले. लोकमान्यांची राजकीय आघाडीवरील पत्रकारिता जेवढी आक्रमक होती तेवढीच सामाजिक बदलांबद्दलची त्यांची मते स्थितीप्रिय होती. त्यामुळेच त्या काळात महात्मा ज्योतीराव ङ्गुले यांची पत्रकारिता वाढली, ब्राह्मणेतर चळवळीतील ‘विजयी मराठा’ किंवा अन्य वृत्तपत्रांचाही बोलबाला झाला. नंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दलित वर्गाची वेदना मांडणारी पत्रकारिता आपण ‘प्रबुद्ध भारत’ किंवा ‘मूकनायक’ यामधून पाहिली.

‘सकाळ’ युग

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अन्य भाषांप्रमाणे मराठी पत्रकारितेतही मोठे बदल दिसू लागले. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता ही मुख्यतः मतपत्रांच्या स्वरूपाची किंवा स्वातंत्र्य मिळविण्याच्या विचाराच्या प्रसाराची होती. पण स्वातंत्र्य मिळाले आणि आता वृत्तपत्रांनी काय प्रकाशित करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यातूनच मग मराठी पत्रकारिता ही समाजातील विविध घडामोडींना स्थान देऊन त्या वाचकांपर्यंत नेऊ लागली. वृत्तपत्रांचा आशय आणि स्वरूप यामधील हा खूपच मोठा बदल होता. त्यातच अमेरिकेत वृत्तपत्रव्यवसायाचे शिक्षण घेतलेल्या आणि तेथील दैनंदिन जीवनातील घटनांचे दर्शन घडविणारी अमेरिकी पत्रकारिता पाहिलेल्या डॉ. ना. भि. परुळेकर यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. उगाच वैचारिक लेखन आणि समाजातील विविध प्रश्‍नांवर आग्रही भूमिका घेण्यापेक्षा जे आजूबाजूला घडते, ज्याचा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होतो अशा गोष्टींना स्थान देऊन दैनिक वृत्तपत्र चालविणे हा पूर्णतः वेगळा असा हा आकृतिबंध होता. शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाचे प्रश्‍न, अडचणी, त्याला आवश्यक त्या गरजा हे बातम्यांचे विषय झाले. पुण्याच्या मंडईत त्या काळी मर्यादित अशा पुण्यातील लोक नियमितपणे जात. ही मंडई हाही बातम्यांचा विषय असू शकतो हे ‘सकाळ’ ने लोकांना दाखवून दिले.
स्वातंत्र्यानंतर इंग्रजी पत्रकारिताही बदलली आणि त्याच पद्धतीने भाषिक पत्रकारितेतही बदल होत गेले. आधी ट्रेडल, नंतर सिलिंडर आणि त्यानंतर रोटरी छपाई यंत्रे यातून वृत्तपत्रांचे तांत्रिक अंग सुधारत गेले. वाढती स्पर्धा आणि जेमतेम सहा तास एवढा छपाईसाठी मिळणारा वेळ यातून वेगवान व एकाच वेळी छपाई करणारी यंत्रे आली. मुंबई, पुणे किंवा नागपूर अशा एकाच ठिकाणी प्रसिद्ध होणारी, एकच आवृत्ती काढणारी बडी आणि साखळी वृत्तपत्रेही बदलू लागली. या वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्त्या अनेक विषय मांडू लागल्या. कथा, कविता, ललित लेख प्रसिद्ध करू लागल्या आणि मराठीतील मासिके आणि साप्ताहिके यांचे अस्तित्वच धोक्यात आले. मराठी संस्कृतीचे वेगळेपण म्हणून आज दिवाळी अंक तेवढे कसेबसे टिकून आहेत. पण त्यांनाही आता ङ्गारसे भवितव्य दिसत नाही.

प्रादेशिक वृत्तपत्रांचे योगदान

मुंबईमध्ये ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती, पुण्यात ‘सकाळ’, ‘प्रभात’, नागपूरला ‘तरुण भारत’, नाशिकला ‘गावकरी’ अशी वृत्तपत्रे निघत होती आणि आपल्या प्रभाव क्षेत्रात वाचकांची भूक भागवत होती. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन पेटल्यावर या लोकचळवळीला प्राधान्य देणारे वृत्तपत्र किंवा मुखपत्र हवे असा विचार पुढे आला आणि त्यातूनच ‘मराठा’ या आचार्य अत्रे यांच्या दैनिकाचा उदय झाला.‘मराठा’ ने आक्रमक पत्रकारिता किंवा मोहीम राबविणारी पत्रकारिता कशी असावी याचा जणू वस्तुपाठ निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या प्रचार - प्रसारात आचार्य अत्रे यांची वाणी आणि ‘मराठा’ द्वारे आग ओकणारी लेखणी यांचे योगदान ङ्गार मोठे आहे. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि एका पद्धतीने विचार केला तर ‘मराठा’चे प्रयोजन संपले. पण संयुक्त महाराष्ट्र समिती आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्र समिती व ‘मराठा’ चे अस्तित्व राहिले आणि ते सत्तारूढ कॉंग्रेसविरोधी राजकारणाचे मुखपत्र झाले.

‘महाराष्ट्र टाइम्स’ मधील स्थित्यंतरे

यानंतर झालेले एक स्थित्यंतर म्हणजे ‘टाइम्स’ वृत्तपत्र समूहाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे मराठी भाषी दैनिक सुरू केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘टाइम्स’च्या व्यवस्थापनाकडे चिकाटीने केलेला पाठपुरावा, महाराष्ट्राच्या मुंबई या राजधानीत ‘टाइम्स’चे असलेले मुख्यालय आणि तेथूनच प्रसिद्ध होणारे ‘नवभारत टाइम्स’ हे हिंदी दैनिक या गोष्टी लक्षात घेऊन मराठी भाषेतील दैनिक ‘टाइम्स’ गटाने प्रसिद्ध करणे योग्य ठरेल असे यशवंतरावांनी जैन बंधूंच्या गळी उतरवले आणि १९६२ मध्ये अनेक अडचणींतून ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू झाले.
द्वा. भ. कर्णिक यांच्यासारखा साक्षेपी संपादक (ज्यांनी ‘नवप्रभे’चे पहिले संपादक म्हणून मुहूर्तमेढ रोवली), त्यांना लोकाभिमुख पत्रकारितेची साथ देणारे माधव गडकरी, सर्वस्पर्शी रविवार आवृत्तीचे संपादन करणारे शंकर सारडा आणि ‘टाइम्स’चा दबदबा व वितरणव्यवस्था यामुळे ‘महाराष्ट्र टाइम्स’ वाढत गेला. त्याचवेळी ‘लोकसत्ता’ या दैनिकाने ह. रा. महाजनींचे लेखन व एक्स्प्रेस समूहाचे वितरण-कौशल्य यामुळे महाराष्ट्रभर आपले जाळे विणले होते.
पुढेे २५-३० वर्षे  गोविंद तळवलकर यांच्यासारख्या अभ्यासू, पण परखड लेखन करणार्‍या संपादकाच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र टाइम्स’चा खूप विस्तार झाला. तळवलकर यांनी एका बाजूला आपल्या घणाघाती लेखनाने आणि अत्यंत अभ्यासू स्वरूपाच्या साहित्याच्या समावेशाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला महाराष्ट्रातील बुद्धिमंत वर्गात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या संपादनाच्या अखेरच्या आठ-दहा वर्षांत ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला धक्के बसू लागले. ‘पत्र नव्हे मित्र’ अशी म. टा. ची जाहिरात सुरू झाली आणि आता तेथे वयोवृद्धांच्या विचारी लेखनाबरोबरच मैत्रीचा मोकळेपणा येऊ घातला आहे हे जाणवू लागले. म. टा.चे गंभीर, दर्जेदार वृत्तपत्राचे जेवढे यश तळवलकर यांचे होते तेवढेच ते तेथे त्यांचे सहकारी असलेल्या दि. वि. गोखले यांचे होते. आपण दोन क्रमांकावरच राहायचे आणि तळवलकर यांना वाचन-लेखनासाठी सवड द्यायची, शिवाय आपली हिंदुत्ववादी विचारसरणी वृत्तपत्रात डोकावू द्यायची नाही हे पथ्य दि. वि. गोखले यांनी पाळले. पण त्यांच्या निवृत्तीनंतर तळवलकरांचे स्थान डळमळीत होऊ लागले आणि व्यवस्थापनाने आधी टिकेकर व नंतर कुमार केतकर यांना क्रमांक दोनवर आणून म. टा.अधिक तरुण वाचकांचा व्हावा असे प्रयत्न सुरू केले.

तरुणांभिमुख वृत्तपत्र


केतकर यांनी संपादक झाल्यावर म. टा. अधिक लोकाभिमुख केला, पण म. टा. च्या वाचकांचा वयोगट खाली आणण्यासाठी आणि तो ‘ट्वेंटी प्लस’ करण्यासाठी अखेर भारतकुमार राऊत यांना आधी कार्यकारी संपादक आणि नंतर संपादक या पदावर आणण्यात आले. राऊत यांनी म.टा. म्हणजे ‘पत्र नव्हे मित्र’ एवढ्यावर न ठेवता ‘पत्र नव्हे स्मार्ट मित्र’ केला. त्यासाठी म.टा. च्या संपादकीय वर्गात ओबीसी समाजातील डॅशिंग तरुणाई आणली. आर. के. लक्ष्मणचा कॉमन मॅन पान ४ व ५ वर गेला. नाटक, सिनेमा, कॉलेज जीवन, पर्सनल ङ्गायनान्स, टॅक्स सेव्हिंग असे विषय म.टा.मध्ये आले. राजकीय बातम्या खूप कमी झाल्या. भाषणांच्या बातम्या बंद झाल्या, बातमीचे मूल्य बदलले आणि सिनेमा, गॉसिप या गोष्टी पान एकवर दिसू लागल्या. पान १ वरील बातमीचा उर्वरित भाग आतील पानावर नको, कोणतीही बातमी ३५० शब्दांपेक्षा अधिक नको, सर्वसामान्य वाचकाला वाचनीय न वाटणारे काहीही अंकात नको असे नवे संकेत रूढ झाले. खेळ, करमणूक, कॉलेज जीवन, लोकांना आवडतील त्या गोष्टींना दाद आणि लोकप्रिय अशा विविध क्षेत्रातील लोकांचा म. टा. तर्ङ्गे गौरव हे सारे लोकप्रिय ठरले. त्याचबरोबर म. टा.ची भाषा बदलली, बोलण्यात सर्रास इंग्रजी शब्द येतात, लोकभाषेतील शब्द येतात, मग ते बातम्यांत, लेखनात का नकोत असे आग्रहाने सांगण्यात येऊ लागले. आपल्या वृत्तपत्राला विद्वत्‌मान्यता नाही मिळाली तर काही बिघडत नाही, पण व्यापक समाजमान्यता हवी असे नवे मार्केटिंगचे तंत्र स्वीकारण्यात आले. संपादक हा राजकीय नेते, अन्य क्षेत्रांतील नेते यात थेट वावरणारा हवा आणि तो प्रभावी इव्हेंट मॅनेजर हवा असा हा बदल होता. म. टा. हा टाइम्स गटाचा, मुंबईहून प्रसिद्ध होणारा पेपर त्यामुळे त्याचे झटपट अनुकरण महाराष्ट्रातील विविध प्रादेशिक व जिल्हापत्रांनी केले आणि बघता बघता मराठी वृत्तपत्रव्यवसाय बदलून गेला.

रंगीत दूरदर्शनचा प्रभाव

१९८४ मध्ये दूरदर्शन रंगीत झाले, त्यामुळे वृत्तपत्रे रंगीत होण्याचे, त्याचे मोठ्या प्रमाणावर संगणकीकरण होण्याचे सत्र सुरू झाले. पीटीआय, यूएनआय यांचे टेलीप्रिंटर्स मोडीत गेले आणि नंतरच्या आठ-दहा वर्षांत इंटरनेटने अवघी मराठी पत्रसृष्टी व्यापून टाकली. २००५ नंतर तर मराठीत डझनभर वृत्तवाहिन्या निघाल्या. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरची रंगीत छायाचित्रे इंटरनेटमुळे सर्वांना मिळू लागली.
आज मराठी वृत्तपत्रसृष्टी आशय, स्वरूप, सादरीकरण या सर्वच आघाड्यांवर पूर्णतः बदलली आहे. पण रंगीत छपाई, अनेक आवृत्त्या, जिल्हा आवृत्त्या, गळेकापू स्पर्धा यामुळे खूप अडचणीत आहे. खप वाढत आहे; पण वाढता खप कागदाच्या वाढत्या किमतीमुळे आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे परवडत नाही. आक्रमक मार्केटिंगमुळे वृत्तपत्रे किमती वाढवत नाहीत आणि ग्राहकाची मानसिकताही स्वस्त वृत्तपत्रे मिळावित अशी झाली आहे. साबण, पेस्ट इतकेच काय बीअरप्रमाणे वृत्तपत्रांचे वितरण व मार्केटिंग केले जात आहे. ज्याची मार्केटिंग स्कीम चालू असेल ती पेस्ट किंवा तो चहाचा पुडा घ्यायचा ही वाचकांची किंवा ग्राहकांची सवय बनू पाहात आहे. चकचकीत, रंगीत पुरवण्या काढणे हे परवडत नसले तरी गरज बनले आहे. ‘टाइम्स ऑङ्ग इंडिया’ च्या एका अंकाचे निर्मिती मूल्य २२ रुपये ५० पैसे आहे आणि विक्रीची किंमत दोन रुपये आहे. ‘टाइम्स’ च्या मार्केटिंग यंत्रणेमुळे आणि प्रतिष्ठेमुळे त्यांना जाहिराती मिळतात; पण इतरांचे काय? त्यांचे निर्मितीमूल्यही आज दर अंकाला दहा रुपयांच्या आसपास आहे.

अस्तित्वाची लढाई

दुसरीकडे कंझ्युमर ड्युरेबल आणि प्रॉडक्ट म्हणजे ग्राहकोपयोगी उत्पादने व साधने यांच्या जाहिराती पूर्णपणे दूरचित्रवाणीकडे गेल्या आहेत. तेथेही एक वाहिनी चालविण्याचा सुमारे २५ कोटींचा वार्षिक खर्च आता परवडत नाही. ब्रिटनमध्ये १५-२० वर्षांपूर्वी वृत्तपत्रे जवळजवळ ङ्गुकट वाटली जात होती, आज बरीच वृत्तपत्रे बंद पडली आहेत. लंडनच्या बीबीसीचे वैभव आणि रुबाब केव्हाच संपला आहे. मराठीतील दिवाळी अंक एकेकाळी खूप समृद्ध होते, आज तरीही शंभरेक बर्‍यापैकी अंक निघत आहेत, पण येत्या पाच वर्षांत ङ्गारच मोजके अंंक निघतील.  मराठी वृत्तपत्राचे बदलते स्वरूप हे असे आहे. येत्या दहा वर्षांत वृत्तपत्राच्या अंतरंगात आणखी बदल होतील; पण ते मुख्यतः अस्तित्व टिकविण्यासाठीच असतील.






ध्येयहीन पत्रकारिता



ग्रामीण क्षेत्र, शेती आणि ग्रामीण गोरगरीब जनता यांच्याशी संबंधित धोरणांवर माध्यमांचा प्रकाशझोत राहिलेला नसल्याने धोरण बनवणार्‍यांसाठीही ते प्रमुख मुद्दे राहात नाहीत. परिणामी आम जनतेऐवजी कॉर्पोरेट क्षेत्रातील विशेष हितसंबंध असलेले समूह धोरणे बनवण्याच्या प्रक्रियेवर आपला वरचष्मा ठेवू लागली आहेत.



अरूण सिन्हा,
संपादक, द नवहिंद टाइम्स


बहुतांशी भारतीय माध्यमांनी आपल्या सामाजिक बांधिलकीला तिलांजली दिली आहे असे
वाटते. जनता आणि सरकार यांच्यातील प्राथमिक दुवा म्हणून ती आज सेवा करीत नाहीत
आणि आपले वाचक/श्रोते (ग्राहक) यांचीही ती निष्पक्षपणे आणि सत्यवादीपणाने सेवा
करताना दिसत नाहीत. बेरोजगारी, नोकरीतील असुरक्षितता, उत्पन्नाची घसरण, गृहनिर्माण, शिक्षण आणि
आरोग्यसुविधा अशा वास्तव जीवनातील प्रश्नांऐवजी माध्यमे आज जनतेच्या विरंगुळ्याच्या
विषयांवर अधिक भर देताना दिसतात. माध्यमे रोज आपल्या ग्राहकांना एक स्पष्ट संदेश देतात - ‘‘आपल्या वास्तव जीवनातील समस्यांची माहिती देण्याची वा त्यावर टिप्पणी करण्याची आमच्याकडून अपेक्षा बाळगू नका. तुमचे तुमी पाहा. आम्ही केवळ आपल्या दुःखातून आपल्याला थोडा आराम देऊ. म्हणून आम्ही आपल्याला सिनेमा, क्रीडा, सेलिब्रिटी आदींविषयी सांगू.’’
सेलिब्रिटी या अफूसारख्या आहेत, अशी जादुई बाब जी लोकांना त्यांचे दुःख विसरायला लावते. सिनेमा, सोप ऑपेरा, संगीत, फॅशन, स्वयंपाककला अशा आपापल्या क्षेत्रांत लोकप्रिय ठरलेल्यांच्या मागे माध्यमे लागली आहेत आणि न्यूज प्रेझेंटर्स, टॉक अँड गेम शोचे यजमान आणि दूरचित्रवाणीवरील गीतगायन, नृत्य आणि प्रश्नमंजुषांच्या विजेत्यांमधून ती नवे सेलिब्रिटी घडवीत आहेत. सेलिब्रिटींवरील हा प्रकाशझोत पत्रकारितेची वस्तुनिष्ठता, निष्पक्षता आणि अचूकता यावर परिणाम करू लागला आहे हे दूरचित्रवाणी वाहिन्या आपल्या सेलिब्रिटी न्यूज प्रेझेंटर्सना महत्त्वाच्या घडामोडींचे वार्तांकन करण्यासाठी पाठवण्याचे धोरण अवलंबतात
यावरून स्पष्ट होते.
याचा परिणाम चांगल्या पत्रकारितेवर झालाय. परिस्थितीची अधिक चांगली माहिती असलेले स्थानिक पत्रकार बाहेर फेकले गेले, आणि वृत्तसंकलनाच्या गुणवत्तेपेक्षा सेलिब्रिटी न्यूज प्रेझेंटरचे दिसणे आणि आतषबाजी यावरच प्रकाशझोत राहिला आहे असे चित्र दिसते. माध्यमांचा भर सेलिब्रिटी आणि करमणूक यावरच अधिक राहिल्याने अधिकाधिक नफ्यासाठी कर्मचार्‍यांवरील खर्चात मोठी कपात करण्यावर भर दिसू लागला आहे. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या तरुण पत्रकारांना प्राधान्य देऊ लागल्या आहेत आणि जिल्हा आणि गावस्तरावर वार्तांकनासाठी पत्रकारांना पाठवण्याच्या खर्चाला कात्री लावली जाऊ लागली आहे. त्यामुळे
वार्तांकनाचे स्त्रोत मर्यादित झाले आहेत आणि सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांचे गांभीर्याने, सखोलतेने वार्तांकन आणि विश्लेषण करणेही कमी झाले आहे. माध्यमांनी स्वीकारलेला हा पलायनवाद एका फार मोठ्या वर्गाकडून त्याचा हक्काचा मंच हिरावून घेणारा ठरला आहे. संविधानाने बहाल केलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य बहुसंख्य
लोकसंख्येच्या दृष्टीने अर्थहीन आणि दिखाऊ बनले आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारविजेते अमर्त्य सेन यांचा सुप्रसिद्ध सिद्धान्त म्हणजे, ‘जगातील दुष्काळांच्या विदारक इतिहासात कोणत्याही स्वतंत्र व लोकशाहीवादी देशामध्ये तुलनेने मुक्त प्रसिद्धीमाध्यमे असताना दुष्काळ कधीही आलेला नाही.’ मात्र, मुक्त पत्रकारितेचा प्रभाव याचा अर्थ पत्रकारिता आपले आर्थिक आणि मनुष्यबळ लोकांच्या दैन्याचे सर्वंकषरीत्या आणि सखोलरीत्या वार्तांकन आणि विश्लेषण करण्यासाठी वापरते असा मानला गेला आहे. बदल घडविण्याची माध्यमांची क्षमता त्यांनी निवडलेले विषय आणि ते कसे सादर केले जात आहेत त्यावर अवलंबून असते. भारतीय माध्यमांनी कमालीचे दारिद्य्र, भूक आणि उपासमार यांना आपल्या प्रमुख विषयांच्या यादीतून वगळून टाकले आहे. माध्यमे जनतेच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांविषयीची माहिती बाजूला सारतात आणि त्या समस्यांवरील आर्थिक व राजकीय चर्चेच्या व्याप्तीवरही नियंत्रण ठेवतात. ग्रामीण क्षेत्र, शेती आणि ग्रामीण गोरगरीब जनता यांच्याशी संबंधित धोरणांवर माध्यमांचा प्रकाशझोत राहिलेला नसल्याने धोरण बनवणार्‍यांसाठीही ते प्रमुख मुद्दे राहात नाहीत. परिणामी आम जनतेऐवजी कॉर्पोरेट क्षेत्रातील विशेष हितसंबंध असलेले समूह धोरणे बनवण्याच्या प्रक्रियेवर आपला वरचष्मा ठेवू लागली आहेत. भारतीय माध्यमे आपले लोकशाहीचे कार्य पूर्ण करताना दिसत नाहीत. माहितीचा आणि कल्पनांचा जनता आणि सरकार यांच्यामध्ये मुक्त प्रवाह खेळता ठेवण्याऐवजी तो आकुंचित
केला जात आहे. माध्यमे जर प्रभावी ठरायला हवी असतील तर अमर्त्य सेन म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी दीनदुर्बळांचा आवाज झाले पाहिजे.
भारतीय माध्यमांचे गरीबीत राहणार्‍या जनतेची मते, ज्ञान आणि अनुभव यांच्याशी आणि त्यांच्या गरजा व त्यांच्या समस्यांवरील उपाय याविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी कोणतेही नाते नाही. दीनदुबळ्यांपर्यंत ते योग्य निर्णय घेऊ शकतील, त्यांना स्वतःच्या हक्कांची जाणीव होईल अशा प्रकारची योग्य माहितीदेखील माध्यमे पुरवीत नाहीत. माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी पडद्याची जागा अव्हेरली गेल्याने दीनदुबळे सार्वजनिक चर्चेतून वगळले गेले आहेत आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्‍या निर्णयांना प्रभावीत करण्यास अक्षम ठरू लागले आहेत.

माझ्या मुठीत माझ्या बातम्या


आजपासून १८ वर्षांपूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट १९९५ ला इंटरनेट आपल्या देशात आले. त्याने प्रसारमाध्यमांना उलटेपालटे केले आहे. आता सगळ्या देशासाठीचे एकेक वृत्तपत्र किंवा दूरचित्रवाणी वाहिनी आता राज्य आणि जिल्ह्यापुरते बनले आहेत. ते आता आणखी गावागावापुरतेच नाही तर माणसामाणसापुरते बनणार आहेत...




सचिन परब
संपादक, ‘गोवादूत’ 


‘कर लो दुनिया मुठ्ठी में’, असे अंबानी जवळपास दहा वर्षांपूर्वी देशभर ओरडून सांगत होते. रिलायन्सने तेव्हा आपला मोबाईल बाजारात आणला होता. पण मोबाईल हातात आला की जग कसे आपल्या मुठीत येईल, हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळत नव्हते. तेव्हा जग नाही, पण निदान मोबाईल तरी आपल्या मुठीत आला. रिलायन्सने मोबाईलमध्ये एकदम स्वस्ताई केली होती. त्यामुळे निम्न मध्यमवर्गच नव्हे, तर गरीबही मोबाईलसाठी सरसावले.
तेव्हा मोबाईल हा कॉल किंवा एसेमेस करणे आणि घेणे एवढ्यापुरताच होता. पण हळूहळू त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. आधी त्यात गाणी ऐकता येऊ लागली. मग कधीतरी रेडियो. आधी त्यात फोटो काढता येऊ लागले. नंतर काढलेले फोटो क्षणात एडिट करून जगात कुठेही पाठवता येऊ लागले. व्हिडिओचेही तसेच. पूर्वी कुठल्या तरी सिनेमाचा, गाण्याचा तुकडा मोबाईलवर पाहण्याचे अप्रूप होते. आता जगभरातले उत्तमोत्तम सिनेमे मोबाईलवर बघता येऊ लागले आहेत. लोक मोबाईलवरच्या कॅमेर्‍याने डॉक्युमेंट्री बनवू लागले आहेत. सुरू असलेली मॅच लाइव्ह बघता येणे सहज शक्य आहे. एसेमेसच्या पुढे जात आज व्हॉटऍप्ससारख्या साध्या ऍप्लिकेशनने सोशल नेटवर्किंग साईट्‌सना पर्याय उभा केला आहे. साध्या फोनकॉलपासून सुरुवात करत जगभर कुठेही असलेला माणूस आपल्यासमोर असल्यासारखे व्हिडियो कॉन्फरन्सिंग करणे आता मोबाईलमधून सोपे होत आहे. नाही नाही म्हणता अफाट जग मोबाईलच्या मुठीत येत आहे आणि मोबाईलमधून आपल्या सगळ्यांच्या मुठीत येऊ लागले आहे.

इंटरनेटचा क्रांतिकारक शोध

या सगळ्या बदलांचे मूळ आहे इंटरनेटमध्ये. मानवजातीच्या इतिहासात चाक किंवा आगीचा शोध जितका मूलगामी फरक पाडणारा ठरला, तितकाच इंटरनेटचा शोधदेखील. हे थोडे अतिशयोक्त वाटले तरी ते खरे आहे. फक्त त्यासाठी इंटरनेटचा असलेला आणि वाढता व्याप लक्षात घ्यायला हवा. आपल्याला ठाऊक असलेल्या आणि नसलेल्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट घुसलेय. ते लवकरच आणखी आतपर्यंत घुसणार आहे. इंटरनेटवरून कालपर्यंत लग्ने जुळत होती. आता क्रांत्या होऊ लागल्या आहेत. कालपर्यंत फक्त परीक्षांचे रिझल्ट बघितले जात होते. आज इंटरनेट देशांची सरकारे बदलवू लागले आहे. त्याचे कारण आतापर्यंत कम्प्युटरमध्ये टेबलावर बसून असलेले इंटरनेट मोबाईलमधून आपल्यासोबत चालते - बोलते झालेय. जग खरेच आपल्या मुठीत आलेय.
जग मुठीत आल्यामुळे जगाशी संवाददेखील अगदी सोपा झालाय. मीडिया म्हणजे प्रसारमाध्यमे त्याचसाठी तर असतात. आता आता पर्यंत वर्तमानपत्रासारखी छापील प्रसारमाध्यमे, रेडियो, टीव्ही यांच्यासारखाच इंटरनेट हा प्रसारमाध्यमांचा एक प्रकार मानला जात होता. आता मात्र इंटरनेट तेवढ्यापुरते नाही. इंटरनेटचा हा डिजिटल मीडिया इतर सगळ्या प्रकारांना गिळून दशांगुळे उरला आहे. आता जगभरातली सगळी महत्त्वाची वर्तमानपत्रे, मासिके इंटरनेटवर जशीच्या तशी पाहता येतात. मोबाईलसाठी अनेक वर्तमानपत्रांची वेगळी ऍप्स उपलब्ध आहेत.

चोवीस तास बातम्या

बातम्या कळण्यासाठी सकाळ उजाडण्याची गरज नाही. पेपरांची ही ऍप्स आपल्याला चोवीस तास घडामोडी कळवतात. इतकेच नाही तर पेपरात जागेअभावी छापता येत नाहीत असे लेख, फोटोही त्यात असतात. युरोप अमेरिकेतली शे - दीडशे वर्षांचा इतिहास असलेली काही वर्तमानपत्रे आज कागदावर छापलीच जात नाही, ती फक्त इंटरनेटवर वाचली जातात. न्यूज चॅनल्स तर टीव्हीवर दिसतात तेव्हा आणि तशीच मोबाईलवर दिसतात. आपण ज्या यंत्रांना रेडियो म्हणतो ती येत्या चार दोन वर्षांतच कायमची अस्तंगत होतील, इतक्या मोठ्या प्रमाणात रेडियो मोबाईलवर ऐकला जातो आहे.
पण या नेहमीच्या माध्यमांच्या पलीकडचा नवा मीडिया इंटरनेटने जन्माला घातला आहे. हा आहे सोशल मीडिया.

चर्चेपासून चावटपणापर्यंत...

या नव्या मीडियाचे पासवर्ड आहेत, फेसबूक, ट्विटर, यूट्यूब, विकिपिडिया, गुगल प्लस, पिकासा, लिंकडेन असे अनेक. तत्त्वज्ञानाच्या गहन चर्चेपासून चावट पोर्नोग्राफीपर्यंत सगळे इथे सुरू आहे. लोक इथे माहिती मिळवत आहेत तसेच आक्रोश व्यक्त करत आहेत. वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडियो जे काही करते ते इथे आहे. इथे आपल्याशी संबंधित घडामोडींची झटकन मिळणारी माहिती आहे. त्यावरची खुली, बेधडक चर्चा आहे. वेगवेगळ्या मतांची रेलचेल आहे. पण इथे माहिती देणारे म्हणजे पत्रकार आणि माहिती मिळवणारे वाचक वेगळे नाहीत. इथे सगळेच वाचक आहेत. इथे सगळेच पत्रकार आहेत. हे उद्याचे प्रसारमाध्यम आहे.

फेसबुकचा पेपर!

उदाहरणच घ्यायचे तर आजच फेसबूकवर पडून असणार्‍या अनेकांना वेगळा पेपर वाचायची गरज भासत नाही, कारण त्यांच्याशी संबंधित सगळ्या घडामोडी त्यांना फेसबुकवरच कळत आहेत. त्याचे फेसबूकचे पेज हा जणू त्याच्यासाठीचा वेगळा पेपरच बनला आहे. हा पेपर आवडू शकणारे अनेक असू शकतात. त्यांना स्वतःचे किंवा असेच कुणाचे तरी फेसबूक पेज हाच पेपर म्हणून पुरेसा वाटणार आहे. असेच यूट्यूब चॅनलचेही आहे. तिथले व्हिडियो त्यांना टीव्ही चॅनलपेक्षा जास्त जवळचे वाटणार आहेत. जगभरातले नको ते वाचण्यापेक्षा किंवा बघण्यापेक्षा मला हवे ते, हवे तसे वाचण्यात किंवा बघण्यात या जगाला रस आहे. त्याला ते इथे मिळणार आहे. पुस्तकात कविता छापून रद्दी वाढवण्याऐवजी त्या फेसबूकवर लाखो जणांशी शेअर करण्यात अनेक कवी आज समाधानी आहेत. ते हळूहळू वर्तमानपत्रांच्या बाबतीतही होऊ लागलेले आहे.
गोव्यासारख्या छोट्या, बांधीव राज्यात तर हे अधिक सहजसोपे आहे. आज मोबाईलच्या कोणत्याही दुकानात जा, इंटरनेटवाल्या मोबाईलची म्हणजे स्मार्टफोनची विक्री तुफान वेगाने सुरू आहे. त्यातला प्रत्येक जण स्वतःचे छोटे ऑनलाइन वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल काढण्यास सक्षम आहे. अशा हजारो, लाखो वर्तमानपत्रांचा आणि टीव्ही चॅनल्सचा आता जमाना येतो आहे...

जा बदलांना सामोरे



इंटरनेटच्या तसेच मोबाईलच्या माध्यमांतून सोशल मीडियाने झेप घेतली आहे. मुद्रित माध्यमांप्रमाणे याला वाचकांच्या मिनतवार्‍या काढाव्या लागत नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणे याला प्रेक्षकांमागे धावावे लागत नाही. नवी पिढी आपोआपच सोशल मीडियाकडे वळते आहे. त्यामुळे उद्योग आणि व्यापार-उदिमातील घटकही सोशल मीडियामध्येच पैसा ओततील. त्यांना आपला ग्राहक कोठे आहेत हे नेमके समजते. नेमकी हीच बाब पारंपरिक मीडियाने लक्षात घेतली पाहिजे.



- संजय ढवळीकर

संपादक, दैनिक हेराल्ड


पारंपरिक प्रसार माध्यमांच्या भवितव्यावरील चर्चा काही आजच सुरू झालेली नाही. ही चर्चा काल होत होतीच, आज होते आहे, आणि उद्याही चालू राहील. पारंपरिक प्रसारमाध्यमे म्हणजे मुख्यत: मुद्रित माध्यमे. म्हणजेच छपाईखान्यातून कागदावर छापून बाहेर पडणारी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके. ही माध्यमे काल होती म्हणून त्यांच्या अस्तित्वाबाबत तेव्हा चर्चा चालायची. आज आहेत म्हणून आजही त्यांच्यावर चर्चा झडताहेत. पारंपरिक मुद्रित माध्यमे उद्याही असणार आहेत, त्यास अनुसरून त्यांच्या भवितव्याबाबत भविष्यातही चर्चा-संवाद होत राहतील. दारात येणारी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके वाचकांना हवी आहेत, म्हणून सारे जण त्यांच्या अस्तित्वाबाबत आणि भवितव्यावर चर्चा करतात. मात्र काळाच्या ओघात घडत असलेले बदल लक्षात घेत आपल्या स्वरुपात आवश्यक ठरणारे बदल अंगीकारत माध्यमांना पुढील वाटचाल करावी लागेल. हा मार्ग जो अनुसरेल तो टिकेल आणि हा मार्ग जो टाळेल त्याचा इतिहास होईल.
गेल्या शतकाच्या मध्यास जन्माला आलेल्या आणि शतकाच्या अखेरीस विकसित झालेल्या दूरचित्रवाणी माध्यमांनाही आता मर्यादित अर्थाने पारंपरिक प्रसार माध्यमे म्हणता येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमे असे सुरुवातीच्या काळात त्यांचे वर्णन केले जायचे. परंतु आता नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्‌स एवढ्या झपाट्याने येत आहेत आणि अत्याधुनिक बनत आहेत, त्या वेगाच्या भरात दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्यात बराच फरक पडला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केवळ मुद्रित माध्यमांच्याच नव्हे तर दूरचित्रवाणी वाहिन्यांच्याही नाकी दम आणला आहे. त्यामुळे सध्या वर्तमानपत्रे आणि नियतकालिके जेवढ्या अडचणीत आहेत असे वाटते आहे तेवढीच अडचण दूरचित्रवाणी वाहन्यांसमोरही उभी आहे.

कठीण परिस्थिती म्हणजे अंत नव्हे

माध्यमांसमोर कठीण परिस्थिती उभी आहे हे खरेच आहे, परंतु कठीण परिस्थिती म्हणजे अंत असे काही नाही. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागते. ही कठीण परिस्थिती माध्यमक्षेत्र सतत फुगतच चालले असल्याने आली आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून माध्यमांचा अतिविस्तार होतो आहे. हा अतिविस्तार पारंपरिक माध्यमांमध्येही होतो आहे आणि सोशल मीडियाचाही होत आहे.
एकीकडे वाचकांची संख्या आणि वाचनसंस्कृती कमी होत असल्याची ओरड चालू असली तरी दुसरीकडे भाषिक आणि इंग्रजी वर्तमानपत्रांची तसेच नियतकालिकांची संख्या वाढतेच आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांचीही तीच कथा. ठराविक वेळेत चालणार्‍या एका दूरदर्शन वाहिनीच्या ठिकाणी आता शंभरावर खाजगी वाहिन्या आल्या, दर महिन्याला त्यात आणखी भर पडत असते. वर्तमानपत्रे, नियतकालिके, वाहिन्या चालण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. देशात आणि जगभरात उद्योग, व्यापारउदिम वाढत असला तरी जन्माला येणार्‍या प्रत्येक माध्यमाला या क्षेत्राचाच आधार असतो. कारण प्रामुख्याने जाहिरात महसुलावरच माध्यमांचा डोलारा उभा असतो.

माध्यमांची गर्दी झालीय 

मुद्रित माध्यमे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांची खचाखच गर्दी झाल्यामुळे आधीच या क्षेत्रात गर्दी झाली आहे, टिकून राहण्यासाठी आणि नफा कमविण्यासाठी गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेमुळे जेरीस आलेल्या पारंपरिक माध्यमांसमोर आता वेगाने फोफावणार्‍या सोशल मीडियाचे आव्हान उभे ठाकले आहे. इंटरनेटच्या तसेच मोबाईलच्या माध्यमांतून सोशल मीडियाने झेप घेतली आहे. मुद्रित माध्यमांप्रमाणे याला वाचकांच्या मिनतवार्‍या काढाव्या लागत नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणे याला प्रेक्षकांमागे धावावे लागत नाही. नवी पिढी आपोआपच सोशल मीडियाकडे वळते आहे. त्यामुळे उद्योग आणि व्यापार-उदिमातील घटकही सोशल मीडियामध्येच पैसा ओततील. त्यांना आपला ग्राहक कोठे आहेत हे नेमके समजते.
नेमकी हीच बाब पारंपरिक मीडियाने लक्षात घेतली पाहिजे. वाचक आणि प्रेक्षक मिळवून किंवा टिकवून ठेवण्यासाठी केवळ बातम्या देण्याच्या पारंपरिक पद्धती चालणार नाहीत. नवीन वाचक-प्रेक्षकाची चव आणि गरज ओळखून आपले माध्यम त्याच्या दृष्टीने योग्य असे बनवावे लागेल. हे करीत असताना पत्रकारितेच्या तत्वांना तिलांजली द्यावीच लागेल असे अजिबात नाही. संपादकाने ठामपणे संपादक राहायचे ठरविले आणि त्याचे फायदे व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिले तर त्याची अडचण होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपली नैतिक आणि व्यावसायिक चौकट आखून घ्यावी लागेल.
‘नवप्रभा’च्या ४३ वर्षांच्या वाटचालीत दोन वर्षे मलाही तेथे उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथे पडेल ते काम धडाडीने करतानाच शिकत राहण्याच्या वृत्तीमुळे ‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या वर्तमानपत्रात काम करण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाला. ‘गोमन्तक’ची जबाबदारी सांभाळणे किंवा ‘गोवा ३६५’ या दूरचित्रवाणी वाहिनीच्या संपादकपदी बसणे त्यामुळेच शक्य झाले. त्या आत्मविश्‍वासातूनच नवीन वर्तमानपत्राची संकल्पना आखून ‘दैनिक हेराल्ड’सारखे वर्तमानपत्र जन्माला घालण्याची हिंमत आली. वैयक्तिक स्तरावर पत्रकारांनीही आधुनिकीकरणाची कास धरत बदल जाणून घेतले पाहिजेत. बदल हीच एक सतत न बदलणारी गोष्ट असते हे जो लक्षात घेईल तो या स्पर्धेच्या युगात पुढे जाईल.
-----

जग तुमच्या मुठीत



टीव्हीमुळे वृत्तपत्र व्यवसाय संपलेला नाही. इंटरनेटमुळे टीव्ही संपला नाही आणि ऍप्समुळे इंटरनेट संपले नाही. मात्र स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या या जमान्यात वरील तिन्ही माध्यमांची सर्व समीकरणे अंतर्बाह्य बदलणार आहेत. कारण स्मार्टफोन हे मीडियाचे एक रूप नव्हे. वृत्तपत्र, टीव्ही, इंटरनेट ही माहिती प्रसारणाची माध्यमे होती. स्मार्टफोन वा टॅब्लेट हे असे माध्यम नव्हे. मात्र या तिन्ही माध्यमांना स्वतःमध्ये सामावून तुमच्या संपर्काच्या सर्व गरजा पुरविणारे ते एक प्रभावी आणि बहुद्देशीय उपकरण आहे. हे एक उपकरण तुमच्याजवळ असले की बस्स... सगळे जग तुमच्या मुठीत...





प्रमोद आचार्य,

संपादक, प्रुडण्ट मीडिया


‘वॉशिंग्टन पोस्ट’ ‘अमेझॉन डॉट कॉम’ च्या संस्थापकाने विकत घेतले आणि पुन्हा एकदा मीडियाच्या बदलणार्‍या वास्तवावर शिक्कामोर्तब झाले.
यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या.
पहिली - शंभर वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेल्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ सारख्या वृत्तपत्राला सध्याच्या ‘मार्केट’मध्ये टिकाव धरणे शक्य झाले नाही.
दुसरी - ‘अमेझॉन डॉट कॉम’ सारख्या एका व्यावसायिक वेब पोर्टलच्या संस्थापकाने हे वृत्तपत्र विकत घ्यायचे धाडस आणि ताकद दाखवली. एवढेच नव्हे तर ‘पब्लिक’ असणारी ही कंपनी आता ‘प्रायव्हेट’ होणार. म्हणजे अमेझॉनचे मालक जेफ बेझोस हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे एकमेव मालक असणार. त्यासाठी त्यांनी मोजलेत अडीचशे दशलक्ष डॉलर.
‘वॉशिंग्टन पोस्ट’चे अध्यक्ष डोनाल्ड ग्रॅहम यांनी जारी केलेल्या अधिकृत वक्तव्याप्रमाणे - ‘इनोव्हेशन्स अँड कॉस्ट कट्‌स् वेअर नॉट इनफ टू स्टेम दॅट डिक्लाईन’ (नावीन्य आणि खर्चकपात हे घसरण थोपवण्यास पुरेसे नव्हते.)
‘वॉशिंग्टन पोस्ट’ च्या महसूलावर नजर टाकली तर एक गोष्ट सहज लक्षात येते. गेली सात वर्षे जाहिरातींतून येणारा पैसा वाढणे सोडाच, हा आकडा सतत तळाला जात राहिला. त्याचाच परिणाम म्हणजे अमेझॉन डील!
पण ही फक्त एका ‘वॉशिंग्टन पोस्ट’ची कहाणी नव्हे. रेड सॉक्सचे अब्जाधीश मालक जॉन हेन्री हे ‘द बॉस्टन पोस्ट’ घेण्याच्या तयारीत आहेत. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने १.१ अब्ज डॉलर मोजून ‘द ग्लोब’ खरेदी केलाय. ही झाली जगाची स्थिती.

सेकंड स्क्रीन

काही दिवसांआधी भारतातील एक प्रथितयश अशा गेमिंग कंपनीचे काही अधिकारी आम्हाला भेटायला आले. बसता क्षणीच ते म्हणाले - ‘द मोबाईल इज बिकमिंग सेकंड स्क्रीन आफ्टर टेलिव्हिजन.’ मी चटकच बोलून गेलो - ‘आय एम सॉरी. नॉट द सेकंड. बट द फर्स्ट!’ आणि खरंच. टीव्हीवर येणारी ब्रेकिंग न्यूज आपल्याला आपण टीव्हीसमोर असलो तरच बघायला मिळते. मोबाईलचे तसे नाही. आपल्या फोनच्या स्क्रीनवर विविध माध्यमांतून बातम्या येत राहतात आणि आपण चालता - बोलता त्या वाचत राहतो.
आजच्या ‘३ जी’ च्या आणि येणार्‍या ‘४ जी’च्या जमान्यात आपण व्हिडियोसुध्दा कम्प्युटर वा टीव्हीवर नव्हे तर आपल्या स्मार्टफोनवर बघतो. जगातले प्रत्येक वृत्तपत्र आपल्याला मोबाईलवर वाचायला मिळते, तेही फुकट. मग आम्ही टीव्हीवाल्यांनी अन वृत्तपत्रवाल्यांनी (पारंपारिक न्यूज मीडियाने) जगायचे कसे?
प्रत्येक माध्यमाची स्वत:ची अशी बलस्थाने असतात, मग तो टीव्ही असो वा वृत्तपत्र. पण आजच्या बदलणार्‍या युगात ही बलस्थाने टिकवून ठेवणे हे सुध्दा फार मोठे आव्हान बनत चालले आहे.
साधे उदाहरण देतो - स्मार्टफोनमुळे सगळे जग आपल्या मुठीत येऊन बसलेय. आधी आपण ही उपाधी कम्प्युटरला द्यायचो. त्याच्या आधी टीव्हीला. त्यापूर्वी वृत्तपत्राला आणि कधीकधी रेडिओला.
आधी वृत्तपत्र दर दिवशी सकाळी संपूर्ण जग तुमच्या दारात आणायचे. मग टीव्ही जग जसे घडते, तसे तुमच्या घरात आणू लागले. नंतर कम्प्युटर जग तुम्हाला हवे तसे आणि तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या बेडरूममध्ये घेऊन आला. आता स्मार्टफोन हेच जग तुम्हाला हवे तसे, हवे तेव्हा आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या सोबत घेऊन येतो आहे. आता बोला!
प्रत्येक वृत्तपत्राचे आणि वृत्तवाहिनीचे स्वतःचे ऍप्स आज ‘आय-ओ-एस’, ‘ब्लॅकबेरी’, ‘अँड्रॉईड’ या सर्व महत्वाच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. बातम्या जशा अपडेट होतात तशा तशा त्या तुमच्या स्मार्टफोनवर येत राहतात. प्रत्येक वृत्त माध्यमाचे आपले स्वतंत्र ट्वीटर आणि फेसबुक पेज आहे. बातम्या या माध्यमांतूनही सतत तुमच्या स्मार्टफोनवर धडक देत राहतात. मग टीव्हीसमोर बसण्याची आणि दररोज सकाळी वृत्तपत्र वाचण्याची गरजच काय?

नव्या पिढीच्या नव्या सवयी

मी काही फार जुन्या पिढीतला नाही. पण मला पेपर हातात घेऊन वाचायला आवडतो. पुस्तकाचे वजन तळहातावर जाणवले नाही तर ते वाचल्यासारखेच वाटत नाही. काही वेळा मी ई-बुक रीडरवर पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, पण दहा मिनिटांच्या आत कंटाळलो. हे असे का झाले?
माझ्या मते, आमच्या पिढीपर्यंतची मुले लहानपणापासून पुस्तके वा वृत्तपत्रे हाती धरून वाचत होती. आमच्या नंतरची पिढीसुध्दा काही प्रमाणात याच पठडीतली. पण त्यानंतरची मुले जर तुम्ही पाहिलीत, तर अभ्यासाचे पुस्तक सोडले तर दुसरी कुठलीही गोष्ट त्यांना हातात धरून वाचायची जरुरी भासलीच नाही. सगळे स्मार्टफोनवर. त्यांची जडण-घडण आणि संगोपनच ह्या माध्यमाने केले. ही पिढीसुध्दा भरपूर वाचते. आकलन करते. पण त्यांचे माध्यम वेगळे आहे. आणि आता तर गोवा सरकारचे धोरण बघितले तर यापुढे मुलांना अभ्यासाची पुस्तकेसुद्धा  टॅब्लेटवर मिळतील! म्हणजे, पुस्तक हातात धरून वाचण्याचा अनुभव काय असतो हे या पिढीतील बहुतेकांना कधी कळणारच नाही.
याचा अर्थ पुस्तक हातात धरून वाचणे म्हणजेच वाचणे असा बिल्कूल नाही. आमच्या पिढीचे ते चांगले आणि नंतरच्यांचे टुकार अशी भावना बाळगणारा एक प्रचंड वर्ग समाजात असतो. आमच्यावेळी ते असे होते! आता काय बोलायचे... अशा सुरांत त्यांची मल्लीनाथी सुरू असते. वाचावे कसे आणि कुठल्या माध्यमातून हा स्वतंत्र विषय आहे. त्यात ‘आमची पिढी, तुमची पिढी’ असली वायफळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आजचे तरूणसुध्दा भरपूर वाचतात आणि आमच्याजवळ होती त्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त माध्यमे, माहिती आणि पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. मुद्द्याचे म्हणजे, कागदावरचे वाचणे हा प्रकार हळूहळू कमी होत जाणार. पण तो संपणार कधीच नाही.

पारंपरिक माध्यमांची भूमिका काय?

मात्र या सगळ्या धामधुमीत पारंपरिक मीडियाची काय भूमिका असणार?
आमच्याच चॅनलविषयी सांगायचे झाले तर टीव्हीशिवाय सगळ्या बातम्या तुम्हाला आमच्या वेबसाईटवर कधीही बघायला मिळतात. प्रत्येक कार्यक्रम दर दिवशी वेबसाईटवर टाकला जातो. या व्यतिरिक्त आमच्या फेसबुक पेजवर बातम्या जशा घडतात, तशा अपडेट होत राहतात. ट्वीटरवर सतत बातम्यांचा भडिमार सुरु असतो. या शिवाय आमची सगळी बातमीपत्रे कधीही तुम्हाला यू-ट्युबवरसुध्दा बघायला मिळतात.
या शिवाय हे सर्व कार्यक्रम आमच्या स्वताच्या अँड्रॉईड ऍपवर लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यायचा आमचा मानस आहे. म्हणजे आणखी एक माध्यम.
या युगात, एकाच वाहिनीच्या बातम्या आणि कार्यक्रम, टीव्ही सोडून किमान चार ठिकाणी तुम्हाला बघायला-वाचायला मिळतात. महत्वाचे म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा आणि हवा तितका वेळ. मग स्मार्टफोन वा टॅब्लेटला सेकंड स्क्रीन संबोधून कसे चालेल?
वृत्तपत्रांचेही तेच. न्यू यॉर्क टाइम्स घेतला तर त्यांचे स्वतःचे ऍप आहे. वेबसाईट सतत अपडेट होत असते. तुम्ही संध्याकाळी पाच वाजता त्यांची वेबसाइट वा ऍप उघडले, तर पाच वाजेपर्यंतच्या सर्व बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील. रात्रीपर्यंत वा सकाळपर्यंत थांबायची गरजच नाही. मध्यरात्री वृत्तपत्र छापायला गेले की दुसर्‍या दिवशीचा संपूर्ण अंक वेबसाइटवर उपलब्ध असतो. काही चॅनल्सच्या वेबसाइटवर तर तुम्हाला जगभर काय चाललेय ते लाइव्ह बघायला मिळते. ही परिस्थिती बघितल्यास पुढच्या पिढीने पारंपरिक मीडियाकडे कसे आणि का म्हणून बघावे?

जुळवून घेणेच श्रेयस्कर

आणि नेमके हेच लक्षात आल्यामुळे प्रत्येक मीडिया हाऊसने या नवनवीन माध्यमांशी जुळवून घ्यायला सुरवात केली आहे. प्रत्येकजण वृत्त आणि माहितीच्या या नवीन अवकाशामध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पूर्ण विचारांती प्रत्येक माध्यमावर आपली पदचिन्हे उमटवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
मग प्रश्न राहतो तो जाहिरातींच्या गणिताचा.
पारंपरिक माध्यमे महागडी आहेत आणि पेलायलाही भारदस्त. पण संपूर्ण माध्यम विश्वाचा पाया या पारंपरिक पध्दतीने बांधला गेलाय. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या रेट्यात भरकटत जाऊन या पारंपरिकतेची सुंदर अशी समाधी बांधणे म्हणजे स्वतःची कबर स्वतःच खोदणे. सध्या तरी या जुन्या पध्दतीपासून दूर जाऊन फक्त नव्या माध्यमाच्या आधारावर जगण्याचे आव्हान पेलणे प्रथितयश कंपन्यांना तरी लगेच शक्य होणार नाही.
ज्या मीडिया कंपन्या या नवीन तंत्रज्ञानाची अर्भके आहेत त्यांचे भवितव्य मात्र अधिक सुखकर आणि सुरक्षित आहे, कारण जुन्याचे ओझे त्यांच्या खांद्यावर नाही आणि महसुलाच्या नवनवीन पध्दतींसोबत प्रयोग करणे त्यांना परवडणारे आहे. मात्र जुन्या कंपन्यांना महसुलाचा दबाव आत्ताही सहन करावा लागतो आणि हे आव्हान पेलणे अशक्यप्राय बनते तेव्हा मग ‘वॉशिंग्टन पोस्ट’ सारखी परिस्थिती उद्भवते.
बाजारात प्रचंड स्पर्धा आहे. गेली पाच वर्षे तर आर्थिक मंदीने सगळे आराखडे जर्जर करून टाकले आहेत. ताटात अन्न तेवढेच आहे, पण खाणारी तोंडे दहा पटींनेे वाढलीयत. अशा परिस्थितीत दोन पर्याय राहतात. एक तर कंपनी बंद करायची वा आपल्यापेक्षा मोठ्या समूहाला ती विकून टाकायची. सध्या दुसरा ट्रेंड चालू आहे.

विस्तार संपला, आकुंचन सुरू

कुठल्याही गोष्टीचा विस्फोट होतो तेव्हा त्या क्षेत्रातल्या सर्व गोष्टी विस्तारत जातात. आणि एकदा का हे विस्तारणे संपले की मग आकुंचन सुरु होते. अखेरीस, त्या समाजाला, त्या अर्थव्यवस्थेला परवडतील आणि पेलवतील तेवढीच माध्यमे शिल्लक राहतात. सध्या आपला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारण्याची टप्पा संपत आलाय आणि आकुंचन सुरू झालेय. पण आपला स्थानिक वा प्रादेशिक पातळीवर विस्तारण्याची टप्पा आत्ताच कुठेतरी सुरू झालेला आहे. म्हणुनच तुम्हाला राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय वाहिन्यांपेक्षा नवीन प्रादेशिक वाहिन्या सुरू होताना दिसतील. वृत्तपत्रांच्या बाबतीतही तेच. सगळ्या राष्ट्रीय मीडिया कंपन्यांनी दोन-तीन वर्षांआधी आपल्या प्रादेशिक वाहिन्या वा वृत्तपत्रे सुरू करण्याचा सपाटाच लावला होता. सध्याच्या मंदीमुळे ह्या विस्तारावर थोड्या मर्यादा आलेल्या आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत स्थिरस्थावर झाल्यावर स्थानिक वा प्रादेशिक पातळीवरचे मार्केट अजून आपल्यासाठी उघडे आहे याची जाणीव सगळ्यांना झालेली आहे. म्हणूनच बहुतेक कंटेंट आता स्थानिक भाषा वा प्रादेशिक माध्यमांतून तयार होताना आपल्याला दिसतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, टीव्हीमुळे वृत्तपत्र व्यवसाय संपलेला नाही. इंटरनेटमुळे टीव्ही संपला नाही आणि ऍप्समुळे इंटरनेट संपले नाही. मात्र स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या या जमान्यात वरील तिन्ही माध्यमांची सर्व समीकरणे अंतर्बाह्य बदलणार आहेत. कारण स्मार्टफोन हे मीडियाचे एक रूप नव्हे. वृत्तपत्र, टीव्ही, इंटरनेट ही माहिती प्रसारणाची माध्यमे होती. स्मार्टफोन वा टॅब्लेट हे असे माध्यम नव्हे. मात्र या तिन्ही माध्यमांना स्वतःमध्ये सामावून तुमच्या संपर्काच्या सर्व गरजा पुरविणारे ते एक प्रभावी आणि बहुद्देशीय उपकरण आहे. हे एक उपकरण तुमच्याजवळ असले की बस्स...सगळे जग तुमच्या मुठीत...
भविष्याचा विचार करायचा झाला तर निश्चितच एक गोष्ट स्पष्ट आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर आपले अस्तित्व आपण अधिकाधिक प्रभावीपणे कसे टिकवू आणि ह्या उपकरणाची बलस्थाने लक्षात घेऊन आपण कशा प्रकारे आपला बिझनेस मॉडेल घडवू त्यावरच प्रसारमाध्यमांच्या व्यवसायाचे भवितव्य अवलंबून असेल, कारण पुढच्या दहा वर्षांनंतर कदाचित आत्ताची आपली ‘मेनस्ट्रीम’ वा मुख्य प्रवाहातील माध्यमे आपल्याला सगळ्यात कमी महसूल देतील व प्रत्येकाच्या मुठीतला स्मार्टफोन आणि त्यावरची आपली पदचिन्हे आपल्या व्यवसायाचा कणा बनतील!
----


डिजिटल युग बदलतेय ज्ञानार्जनाची संस्कृती


या डिजिटल माध्यमांना मर्यादा नाही. ते अमर्याद ज्ञानाचे खजिने आहेत. या रेसमध्ये टिकायचे असेल तर आपणास ‘जुने तेचे सोने’ म्हणून त्याला मिठी मारून बसता येणार नाही. छापील वृत्तपत्रे वा पुस्तकांचे महत्व कमी होणार नाही. केवळ ते वाचण्याची उपकरणे बदलतील, बदलत आहेत, बदललेली आहेत. त्यानुसार आपणालाही बदलावे लागेल.


- संदेश प्रभुदेसाई, 

संपादक, गोवान्यूज.कॉम


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एक धक्कादायक बातमी वाचायला मिळाली. अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ हे वृत्तपत्र ‘अमेझॉन.कॉम’ या इंटरनेटवरील ई-शॉपिंग करणार्‍या जगप्रसिद्ध वेबसाईटचे संस्थापक मालक जेफ बेझोस यांनी २५ कोटी डॉलरना विकत घेतले. गेली १३६ वर्षे चालणार्‍या या वृत्तपत्राची परंपरा फारच प्रेरणादायक आहे. १९७० साली या वृत्तपत्राच्या बॉब वूडवर्ड व कार्ल बर्नस्टाईन या दोन पत्रकारांनी शोधपत्रकारितेतून ‘वॉटरगेट’ प्रकरण फोडले होते व त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रीचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या वीस वर्षांत या वृत्तपत्राच्या छापील आवृत्तीचा खप ८ लाखांवरून ४ लाखांवर घसरला. गेली सात वर्षे त्यांचे जाहिरातीचे उत्पन्न सातत्याने घसरतच आहे. आज ते केवळ साडेपाच कोटी डॉलर्स आहे. अवघ्या एका वर्षात या वृत्तपत्राचे एकूण उत्पन्न २८ कोटी डॉलर्सवरून अवघ्या १३ कोटी डॉलरवर घसरले आहे. इंटरनेटच्या युगात वावरणारे बेझोस आता ‘वॉशिंग्टन पोस्ट’ छापील वृत्तपत्र म्हणून चालविणार की केवळ इंटरनेट आवृत्तीच चालवणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण गेली ८० वर्षे प्रभावी पत्रकारितेचे उदाहरण संपूर्ण जगाला घालून देणार्‍या ‘न्यूजवीक’ या नियतकालिकाची छापील आवृत्ती या वर्षाच्या सुरवातीपासून कायमची बंद करण्यात आलेली आहे. सुमारे दीड कोटी नवीन वाचक ‘न्यूजवीक’ची इंटरनेट आवृत्ती वाचण्यासाठी भेट देतात. एका वर्षात  इंटरनेटवरील त्यांच्या हिट्स ७० टक्क्‌यांनी वाढल्या. मात्र दुसर्‍या बाजूने छापील आवृत्तीचा खप प्रचंड प्रमाणात घसरत गेला. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला.
अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये  मिळून सुमारे ३३०० वृत्तपत्रे चालतात. त्यातील १६६ वृत्तपत्रे गेल्या दोन वर्षांत कायमची बंद झाली. जवळजवळ ३५ हजार वृत्तपत्र कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. ‘यूएसए टुडे’ हे अमेरिकेतील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र १७ लाख लोक विकत घेऊन वाचतात तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ची डिजिटल आवृत्ती आठ लाखांच्या घरात वर्गणी देऊन इंटरनेटवर वाचली जाते. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये कागदावरील वाचनाची जागा आता संगणक, टॅब्लेट व मोबाईलने घेतलेली आहे. यातील अवघीच काही वृत्तपत्रे इंटरनेट आवृत्तीसाठी मासिक वर्गणी घेतात, मात्र बहुतेक सगळी वृत्तपत्रे वा मासिके विनामूल्य वाचकांना उपलब्ध करून देतात. अशावेळी वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारे कमी होत गेले तर त्यात नवल काय?

इंटरनेट वापरात भारत तृतीय स्थानी

लोकसंख्येच्या दृष्टीने बघितल्यास जागतिक पातळीवर इंटरनेटचा सर्वाधिक वापर चीनमध्ये केला जातो. सुमारे ५७ कोटी लोक इंटरनेट वापरतात, परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ ४२ टक्के. दुसर्‍या क्रमांकावर अमेरिकेचा नंबर लागतो. २५ कोटी लोक इंटरनेट वापरणार्‍या या देशात टक्केवारीच्या प्रमाणातही अमेरिकेत ८१ टक्के लोक इंटरनेटवर असतात. तिसरा क्रमांक लागतो भारताचा. आपल्या देशात १५ कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ १३ टक्के. २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण केवळ तीन टक्के घरांमध्ये केंद्रित झालेले आहे. त्यात कार्यालयांचाही समावेश आहे. गोव्यात हेच प्रमाण नेमके उलटे आहे. इथे १३ टक्के घरांमध्ये इंटरनेटचा वापर होतो. म्हणजे तीन लाखांतील सुमारे ४१ हजार घरे. मात्र भारतात मोबाईल वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जनगणनेनुसार ६० टक्क्‌यांच्या जवळपास लोक मोबाईल वापरतात. गोव्यात अडीच लाख घरांतून मोबाईल आहेत.
आज काल बोलण्याशिवाय इतर कित्येक गोष्टी मोबाईलवर होतात. त्यात तो स्मार्ट फोन असला तर त्यावर इंटरनेट, ईमेल आणि जीपीआरएस वा थ्रीजीवर चालणार्‍या मोबाईलवरील एप्लिकेशन्स आणखीही कित्येक गोष्टी स्वस्तात मिळवून देतात. शिवाय तोच मोबाईल वा टॅब्लेट कार्यालय वा घरातील वायफायशी जोडलेला असल्यास टीव्ही चॅनल्स धरून सगळ्या गोष्टी फुकटात वाचायला, ऐकायला वा बघायला मिळतात. १२६ कोटींच्या आमच्या देशात आज ४३ कोटी युवक आहेत. म्हणजे प्रत्येक तिसरी व्यक्ती युवा आहे. २०२१ पर्यंत युवकांची संख्या ४७ कोटींवर जाईल असा अंदाज आहे. म्हणजे जगातील सर्वांत युवा देश असेल भारत. ही संपूर्ण पिढी इंटरनेट, मोबाईल वा टॅब्लेटमय झालेली आहे. ही युवा पिढी वाचत नाही हा समज पूर्ण चुकीचा आहे. उलट तो कालच्या पिढीहूनही जास्त वाचतो. परंतु सर्व काही फेसबूकसारख्या सोशल नेटवर्कवर अथवा मोबाईल वा टॅब्लेटवर. ई-बूक वाचणार्‍यांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. तिथे त्यांना वृत्तपत्रातील बातम्याही मिळतात आणि त्याशिवाय वृत्तपत्रांत येत नाहीत अशाही बातम्या तिथे चघळल्या जातात.

फेसबुकची वाचन संस्कृती

फेसबुकवर आपण ओळखतच नसतो अशी जगभरातल्या ‘मित्रां’ची एक साखळी तयार होते. त्याद्वारे एकाने टाकलेला ‘स्टेटस’ या साखळीद्वारे ‘व्हायरल’ होऊन पसरत जातो. त्यात वैयक्तिक गोष्टी असतात, कुटुंबातल्या असतात, मित्र परिवारातल्या असतात, संस्था वा कार्यालयीन असतात व शिवाय सामाजिक विषयांशी संबंधितही असतात. त्यावर मुक्तकंठाने चर्चा होते. एकमेकांचे कौतुक व वादविवादही होतात. हे सगळे मित्र कधीकधी एकामेकांवर तुटूनही पडतात. वेगवेगळ्या विषयांवर गट तयार केले जातात. वेगवेगळ्या संस्थांची पाने तयार केली जातात. ती ‘लाईक’ केली की आपण त्या गटांचे वा पानांचे सभासद होतो. तिथे तर कित्येक गंभीर विषयांवर उलटसुलट चर्चा होतात.
या डिजिटल चमत्कारातून भारतातले पहिले जनआंदोलन उभे राहिले ते गोव्यात. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या प्रश्नावर गोमंतकीय युवकांनी ग्रूप तयार केला आणि व अवघ्या दोन दिवसांत त्याचे दहा हजार सभासद झाले. त्यातूनच त्यांनी आंदोलन उभे केले. पथनाट्याची स्क्रीप्ट त्यांनी फेसबुकवर टाकली आणि गोव्यात तीन ठिकाणी नटसंच उभे राहिले. प्रमोद मुतालिकांच्या श्रीराम सेनेला गोव्यात येण्यास विरोध करणारा असाच एक ग्रूप फेसबुकवर तयार झाला आणि त्यातून त्यांच्या बैठका होऊन आणखीन एक आंदोलन उभे राहिले. त्याची दखल घेऊन सरकारला भूमिका घ्यावी लागली. लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलन उभारले, तेही असेच सोशल मीडिया नेटवर्कमधून भारतभर पसरले आणि लाखो युवक रस्त्यावर उतरले. अर्थात, त्यात इंटरनेटहूनही जास्त प्रभाव पडला तो टीव्ही चॅनल्सचा. तरीही एका फेसबुकवरील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या पानाचे भारतभरातून १० लाख सदस्य आजसुद्धा आहेत.

टीव्ही वाहिन्याही होतायत डिजिटल

एका बाजूने इंटरनेटचा असा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे तर दुसर्‍या बाजूने टीव्ही वाहिन्यांनी आपल्या आयुष्याची परिक्रमाच उलटीपालटी करून टाकलेली आहे. भारतात दीडशेहून जास्त चॅनल्स बातम्यांचे आहेत. सर्वाधिक ५४ चॅनल्स एका हिंदी भाषेतील आहेत. इंग्रजी न्यूज चॅनल्स आहेत २०. त्यानंतर तेलगू १६, तामीळ १०, कन्नड व बंगाली प्रत्येकी ८, मराठी, गुजराती, आसामी व मल्याळम प्रत्येकी ७ तर पाचाहून कमी. जवळजवळ सगळ्याच भारतीय प्रादेशिक भाषांतून आहेत. जगभरातील मंदीच्या लाटेचा फटका भारताला बसला त्याच वर्षी दिल्लीत एक भोजपुरीतील बातम्यांचा चॅनल सुरू झाला व वर्षभरात त्याने नफासुद्धा कमावला.
हे सगळे सॅटेलाईट चॅनल्स. त्या मानाने एकही सॅटेलाईट चॅनल उभा राहू शकला नाही तो गोव्यात. इथले केबलवर चालणारे चॅनलसुद्धा प्रचंड तोट्यात चालत आहेत. अत्यंत कमी कर्मचारीवर्ग घेऊन चालवलेले चॅनल्स तेवढे थोडाफार नफा कमावू शकतात. परंतु हा नियम नव्हे; गोवा हा अपवाद. मात्र या टीव्ही चॅनल्सनीही आज स्वतःच्या वेबसाईट तयार केलेल्या आहेत. त्यावर छापील मजकूरही असतो आणि व्हिडियोही. शिवाय काही राष्ट्रीय पातळीवरील चॅनल्सना टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स जेवढे मिळत नाहीत, त्याहून जास्त हिट्स त्यांच्या वेबसाईटना मिळतात. शिवाय आता मोबाईल आणि टॅब्लेटवरही हे चॅनल्स सहजगत्या मिळतात. आजच्या घडीला त्यांची डाउनलोडिंग किंमत जरा महाग आहे. परंतु वाय फाय असल्यास ही किंमत लागत नाही. आणि उद्या डायरेक्ट डाउनलोडिंगसुद्धा स्वस्त केल्याशिवाय पर्यायच राहणार नाही.

वृत्तपत्रांचे इंटरनेटीकरण अपरिहार्य

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात आजच्या घडीस छापील वृत्तपत्रांचेच राज्य चालते. आठ हजारांच्या आसपास हिंदी वृत्तपत्रांचा वाचक आहे १६ कोटी. दीड हजारांच्या आसपास असलेली इंग्रजी वृत्तपत्रे साडेपाच कोटी लोक वाचतात. त्यानंतर क्रमांक लागतो तो हजारभर ऊर्दू वृत्तपत्रांचा. त्यानंतर गुजराती ७६१, तेलगू ६०३, मराठी ५२१, बंगाली ४७२, तामीळ २७२, उडिया २४५, कन्नड २००, मल्याळम १९२ अशी ही आकडेवारी कमी होत जाते. परंतु सर्वच भारतीय भाषांतील वृत्तपत्रे मिळून सुमारे ३३ कोटी लोक अजूनही कागदावरील वृत्तपत्रे वाचतात. मात्र वृद्ध वाचक मरण पावला तर त्या प्रमाणात नवीन युवक वाचक तयार होत नाही. त्यामुळे हा वाचकवर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे हेही तेवढेच सत्य आहे.
दुसर्‍या बाजूने बहुतेक सर्वच वृत्तपत्रांना आपली डिजिटल आवृत्ती इंटरनेटवर आणण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तीही दोन प्रकारांची. एक रोजचे वृत्तपत्र जशास तसे ई-पेपर म्हणून वृत्तपत्राच्या वेबसाईटवर लोड करणे व दुसरी सातत्याने बातम्या अपडेट करत राहणारी प्रत्यक्ष इंटरनेटची वृत्तपत्रीय वेबसाईट तयार करणे. परंतु एवढेच करून आजकाल भागत नाही. या वृत्तपत्रांना आपापले पान फेसबुकवर तयार करावे लागते, कारण आजचा युवक फेसबुकमधून वृत्तपत्राकडे जातो. थेट वृत्तपत्राच्या वेबसाईटवर येणारे त्या मानाने कमीच. त्याशिवाय महत्त्वाच्या बातम्या गूगल प्लस, लिंक्डइन अशा सोशल मीडिया नेटवर्कवरही लोड कराव्या लागतात. त्याशिवाय ट्वीटर हा तर आणखीनच अनोखा प्रकार. तो संगणकापेक्षा मोबाईल व टॅब्लेटवर जास्त लोकप्रिय आहे. आजकाल सगळ्याच भाषा मोबाईलवर मिळतात. त्यामुळे कित्येक वृत्तपत्रांनी मोबाईल ऍप्लिकेशन्स तयार केलेली आहेत. शिवाय ट्विटरसाठीही ऍप्लिकेशन्स तयार केलेली आहेत. ती मोबाईल वा टॅब्लेटवर उतरवली की फुकटात बातम्यांचा रतीब दिवसरात्र चालू असतो. ट्वीटरवर तर एका ओळीची बातमी आणि खाली तिला संपूर्ण बातमीची लिंक. हवी असली तर क्लिक करा आणि बातमी वाचा, ऐका वा प्रत्यक्ष व्हिडियोमधून बघा. नाहीतर पुढची वन-लाईनर बातमी वाचा.
हे एवढे सगळे मोफत आणि सहजगत्या मिळत असताना रोज सकाळी वृत्तपत्र विकत घेऊन वाचण्याची संस्कृती किती काळ टिकून रहाणार हा प्रश्न विचारण्याचीही गरज नाही. वाचन संस्कृती खात्रीने लोप पावणार नाही. परंतु कागदावर छापलेले वाचण्याची संस्कृती जास्त काळ टिकून राहील असे वाटत नाही. हातात घेऊन फिरण्याची वा गुंडाळण्याची गरज नाही, फाटण्याची भीती नाही आणि भिजण्याचीही शक्यता नाही. सगळे काही संगणकावर, मोबाईलवर वा टॅब्लेटवर. शिवाय जगात कुठेही जा, तुमचे वृत्तपत्र तुमच्या मोबाईलवर सतत तुमच्याबरोबर राहील. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात वा देशात गेलो म्हणून आपले आवडीचे वृत्तपत्र आता कसे वाचायचे हाही प्रश्न नाही.
शेवटी वृत्तपत्र हे प्रसारमाध्यमांतील एक माध्यम आहे. एकामेकांशी संवाद साधणे हा माध्यमाचा स्थायीभाव आहे. तो काही अक्षर निर्मितीपासून सुरू झाला नव्हता. ख्रिस्तपूर्व २००० सालात कधीतरी अक्षराचा शोध लागला. त्यापूर्वी आणि नंतरसुद्धा कित्येक हजारो वर्षे मौखिक माध्यमांद्वारेच जनसंवाद साधला जाई. खास करून कलाविष्कारांच्या गायन, नृत्य, नाटक अशा लोककलांच्या विविध माध्यमांतून. छपाईचा शोध लागण्यास तर १४५२ साल उजाडावे लागले. आशियातला पहिला छापखाना गोव्यात पोर्तुगिजांनी सुरू केला तो १५५६ साली. म्हणजे सोळाव्या शतकात. त्यानंतर वाचन संस्कृती खर्‍या अर्थाने बहरली. पण म्हणून त्या पूर्वीची हजारो वर्षे अडाणीपणाची होती असे म्हणण्याचा मूर्खपणा कुणी करणार नाही. कित्येक शोध लावले गेले, अश्मयुगापासून कित्येक संशोधनांद्वारे मानवी संस्कृतीचा विकास होत गेला. या संपूर्ण चित्तथरारक आणि प्रेरणादायी अशा मानवी जीवनाच्या प्रवासातील छापील वाचन संस्कृतीचा काळ हा केवळ पाचशे-सहाशे वर्षांचा.

संस्कृती तीच, बदलताहेत उपकरणे

पूर्वी दगडांवर, धातूंवर, लाकडावर, पानांवर लिहीत लिहीत कागदावर लिहायची परंपरा सुरू झाली. त्यानंतर छापील परंपरा. आज तीच अक्षरे इंटरनेटद्वारे संगणक, मोबाईल, टॅब्लेटवर लिहिलेली आपणाला वाचायला मिळतात. कालपर्यंत दृक - श्राव्य माध्यमासाठी आपणाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ते पहावे व ऐकावे लागे. नंतर रेडियो, ग्रामोफोन, टेप, कॅसेट, सीडी अशी श्राव्य माध्यमांची उपकरणे येत गेली. मात्र आधी सिनेमा व नंतर टेलिव्हिजनने दृकश्राव्य माध्यमांतून नवीन क्रांतिकारी उपकरणे तयार झाली, सॅटेलाईट तंत्रज्ञानाने संपूर्ण जग आपणापुढे आणले. नंतर व्हीसीडी आणि डीव्हीडी. आता त्यानंतर इंटरनेट, मोबाईल, टॅब्लेट हे नवे तंत्रज्ञान. शिवाय एमपीथ्री आणि एमपीफोर.
मात्र एक गोष्ट खरी. तंत्रज्ञानाच्या या युगात संपर्क माध्यमाची उपकरणे कितीही बदलली तरी शेवटी शब्द, अक्षरे, श्रवण व दृक् (पाहणे) हे चिरंतनच असणार. वाचण्याची, ऐकण्याची वा बघण्याची माध्यमे वा उपकरणे बदलतील. परंतु ती संस्कृती मात्र टिकून राहील. त्यातील अर्थकारण बदलेल. परंतु समाजकारण आणखीनही प्रगल्भ होईल. कदाचित वाचन, श्रवण व बघण्याच्या पद्धती बदलतील, परंतु ज्ञानार्जनाची संस्कृती कदापि बदलणार नाही. उलट ती आणखीनही वृद्धिंगत होईल. या दृष्टिकोणातून आपण या माहिती युगाच्या तंत्रज्ञानाकडे बघितले तर आपल्या मनातले प्रश्न आपसूकच सुटतील. या टीव्ही आणि इंटरनेटमुळे वाचन संस्कृतीचा ह्रास होत चाललेला आहे वा ज्ञानार्जनाची भूक मरत चाललेली आहे असा शंख करीत आपण बसणार नाही. आजच्या पिढीजवळ बसा, त्यांना समजून घ्या आणि तुम्हाला कळेली की त्यांना आपल्याहून जास्त ज्ञान आहे. केवळ परीक्षेत पास होण्याच्या ज्ञानापेक्षाही जास्त ज्ञान त्यांच्यापाशी आहे (अर्थात, त्यात वाईट गोष्टींचे ज्ञानसुद्धा आले, जसे ते कालही होते.)
या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण आजच्या वृत्तपत्रांकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की वृत्तपत्रांना एक मर्यादा असते. मात्र या डिजिटल माध्यमांना मर्यादा नाही. ते अमर्याद ज्ञानाचे खजिने आहेत. या रेसमध्ये टिकायचे असेल तर आपणास ‘जुने तेचे सोने’ म्हणून त्याला मिठी मारून बसता येणार नाही. छापील वृत्तपत्रे वा पुस्तकांचे महत्व कमी होणार नाही. केवळ ते वाचण्याची उपकरणे बदलतील, बदलत आहेत, बदललेली आहेत. त्यानुसार आपणालाही बदलावे लागेल. जशा आमच्या हजारो वर्षांच्या पिढ्या बदलल्या, त्याचप्रमाणे. चला, या बदलांचे मनापासून स्वागत करूया

---

आव्हान काळाप्रमाणे बदलण्याचे


आकाशवाणी कालबाह्य झाली. पण एफ. एम. स्टेशने जोरात चालतात, कारण तरुणाईची ती पसंती आहे. निवेदकांची नुसती चर्पटपंजरी. नाना पाटेकर किंवा गोविंदा यांची संवादशैली म्हणजे मशीनगनमधून सुटणार्‍या गोळ्या. एफ. एम. वाल्यांचे आदर्श ते. अध्येमध्ये नावापुरते गीत संगीत, तेही पाश्‍चात्त्य सुरावटींचे. कोण विचारतो लता मंगेशकरना? सुरेलपणा खुंटीला टांगला. तेच बहुधा यापुढे वृत्तपत्रांचे होईल. 



सुरेश वाळवे

ज्येष्ठ पत्रकार

प्रणव रॉय, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, करण थापर, रजत शर्मा, निखील वागळे, डॉ. उदय निरगुडकर, प्रमोद आचार्य, संदेश प्रभुदेसाई वगैरेंना कोण ओळखत नाही? या सगळ्यांचे चेहरे प्रेक्षकांना माहीत आहेत, याचे कारण ते अष्टौप्रहर चालणार्‍या वृत्तवाहिन्यांचे संपादक किंवा अँकर आहेत/होते म्हणून. अशाच प्रकारे वृत्तनिवेदक/निवेदिकांनाही आपण ओळखतो. एकेकाळी नागेश करमली, पुरूषोत्तम सिंगबाळ, कृष्णा लक्ष्मण मोये, रमेश सखाराम बर्वे, अनंत केळकर ही मंडळी आपल्याला ‘ऐकून’ माहीत होती. म्हणजे पणजी आकाशवाणीवरील या निवेदकांचा आवाज परिचित होता. ‘बिनाका गीतमाला’ गाजत होती, तेव्हा अमीन सायानी ‘सर्वतोकानी’ होते. आज आपले मुकेश थळी ‘आवाज की दुनियामें’ आहेत. पण हळूहळू रेडिओ हे श्राव्य माध्यम मागे पडले अन् इडियट बॉक्सचा जमाना आहे, याचे कारण प्रत्येक गोष्टीची सद्दी काही काळच असते. हाच न्याय मुद्रित माध्यमांनाही लागू होतो. म्हणूनच रात्रंदिवस बातम्यांचा रतीब घालणार्‍या वृत्तवाहिन्या आणि फेसबुक, ट्वीटर वगैरे सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहात मुद्रित वृत्तमाध्यमे वाहून तर जाणार नाहीत ना, अशी भीती काहींना (विशेषतः जे सध्या या क्षेत्रात आहेत त्यांना) वाटणे साहजिक आहे. परंतु बदल ही एकच गोष्ट चिरंतन असते हे त्रिकालाबाधित सत्य जर ध्यानी घेतले तर नव्या माध्यमांच्या ‘ऑनस्लॉट’ मुळे हबकून जायचे कारण नाही. दहा - बारा वर्षांपूर्वी जेव्हा अखंडित न्यूज चॅनल्सचा उदय झाला, तेव्हाही आता दैनिकांचे भवितव्य काय? अशी आशंका अनेकांना वाटली होती. ती खोटी ठरली हे तर उघडच आहे. मग आजच मुद्रित वृत्तमाध्यमांच्या भवितव्याविषयी चिंता निर्माण का व्हावी?

रात्रंदिन युद्धाचा प्रसंग

शे-शंभर वर्षांपूर्वीची भारतातील पत्रकारिता ध्येयवादी होती आणि स्वातंत्र्यप्राप्ती हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. स्वातंत्र्यानंतर तिची ‘मोख’ बदलली. स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल करणार्‍या नवस्वतंत्र देशाला विकासाची तहान लागली होती. तिचेच प्रतिबिंब प्रसार माध्यमांमध्ये पडलेले असायचे. मोठमोठ्या योजना आकार घेऊ लागल्या, तसतसा त्यातील भ्रष्टाचारही उघड होऊ लागला. राज्यकर्त्यांवर एका बाजूने विरोधकांचा अंकुश आणि दुसरीकडे वृत्तपत्रांचा, असे चित्र सर्रास दिसू लागले. ही परस्पर पूरकता देशहिताचीच होती. आजदेखील काही वेगळे चित्र नाही. परंतु प्रसारमाध्यमांमधील स्पर्धा अगदी गळेकापू म्हणता येईल एवढी वाढली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या दृष्टीने ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती उद्भवली आहे.
वृत्तपत्रे म्हणा वा नियतकालिके किंवा अन्य प्रसार साधने घ्या, प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे काही तरी देण्यासाठी धडपडत आहेत. अलगपणा राखला तरच टिकून राहू याची खात्री असल्याने धावपळ वाढली आहे. या घाईत काही वेळा चुकीचे वृत्तांकन होणे साहजिक आहे, परंतु ते विश्वासार्हता गमावून बसण्याइतके गंभीर बनले तर मात्र खरा धोका आहे.
अफवा, कंड्या, बाजारगप्पा यासाठी कोणी वृत्तपत्रे घेत नसते वा बातम्या पाहत नसते. जे अन् जसे घडले, तसे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यासंदर्भात जेव्हा भ्रमनिरास वा अपेक्षाभंग होतो, तेव्हा वाचक/प्रेक्षक उदासीन बनतो. प्रसारमाध्यमांपुढे जर कोणते आव्हान उभे असेल, तर ते ही विश्वासार्हता टिकवण्याचे.
एक उदाहरण घेऊ. हल्लीच कालवी - हळदोणे पुलाची एक लोखंडी तुळई बांधकाम चालू असताना पडली. त्यासंबंधात उलटसुलट बातम्या आल्या. पण प्रकार गंभीर होता की साधा मामला याविषयी खोलात जाऊन माहिती देण्याचे कष्ट कोणी घेतले असे जाणवले नाही. कमकुवत बांधकाम आणि अकाली माना टाकण्यासाठी गोव्याचे पूल ओळखले जात असल्याने सर्वसामान्यांच्या मनात किंतु निर्माण झाला असेल तर त्यांचा काय दोष? त्यांना आश्‍वस्त करणे ही जरी सरकारची जबाबदारी असली, तरी वस्तुस्थितीची जाणीव करून देणे, हे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य होते. त्यात आपण कमी पडलो का याचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे.

कानांमागून येऊन तिखट

पारंपरिक पत्रकारिता मागे पडून कानांमागून येऊन इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे तिखट तर होणार नाहीत ना, अशी अनेकांना भीती वाटते, ती अनाठायी नाही, याचे कारण भारत हा तरुणांचा देश आहे आणि युवामन तर नेहमी परंपरेच्या बेड्या फोडून नावीन्याकडे धाव घेत असते. वाचनसंस्कृती दिवसेंदिवस घटत चालली आहे हे आणखी एक कारण. पीसी, लॅपटॉप वगैरे सोडून द्या. आताचा जमाना थ्रीजी, फोर जी वगैरेंचा आहे आणि सध्या आबालवृद्धांच्या हातांना जसे मोबाईल चिकटलेले असतात, तसे उद्या टॅबलेट चे झाले तर आश्‍चर्य नको. आता सरकारच जेव्हा विद्यार्थ्यांना हे सारे पुरवणार आहे, तेव्हा असंभव तरी काय? सबब, ही पिढी अशीच आधुनिक अन् सुटसुटीत माध्यमांकडे वळणार आहे हे निश्‍चित. हा धोका किंवा शक्यता लक्षात घेता वृत्तपत्रांना, खास करून दैनिकांना बदलावे लागेल.
कुमार केतकर हे मराठी वृत्तपत्रसृष्टीतील मोठे नाव. पां. वा. गाडगीळ, द्वा. भ. कर्णिक, पु. रा. बेहरे, ग. त्र्यं. माडखोलकर, माधव गडकरी, गोविंद तळवलकर यांच्या नंतर कुमार केतकरांचे स्थान असेल. कूली नं. १, बीबी नं. १, खिलाडी नं. १ असे बॉलिवूडच्या भाषेत सांगायचे तर आज घडीस ‘एडिटर नं. १’ आहेत. ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते, तेव्हा म्हणे टाइम्स समूहाने वाचकांचे सर्वेक्षण केले.  त्याचा निष्कर्ष असा निघाला की तरूण वाचकांना महाराष्ट्र टाइम्स आकर्षित करू शकत नाही. पुरोगामी विचारसरणी असूनदेखील नाही म्हटले तरी केतकर बिलॉंग्स टु ओल्ड स्कूल ऑफ जर्नालिझम. तेव्हा ते रातोरात कसे बदलतील? सबब, भारतकुमार राऊत यांना कार्यकारी संपादक नेमण्यात आले. परिणाम व्हायचा तो (किंवा व्यवस्थापनाला अपेक्षित) झाला. केतकर राजीनामा देऊन निघून गेले. भारतकुमारनी म. टा. त परिवर्तन केले. सुटसुटीत बातम्या आणि छोटे छोटे लेख. लेआऊट रीडर्स फ्रेंडली केला. जणू पेपरने नवे रुपडे धारण केेले. विविध थरांतील वाचकांना बांधून घेणारे उपक्रम सुरू झाले.

आलिया भोगासी..

खरे तर हे वृत्तपत्रांचे काम नव्हे. काय करणार! आलिया भोगासी... १ रुपयाने पेपर, सोबत आकर्षक भेटवस्तू या सार्‍या क्लृप्त्या चालूच आहेत. जो त्यांची कास धरणार नाही तो मागे पडेल. मनाविरुद्ध का होईना, हे उटपटांग करावे लागते. बहुतेक संपादकांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो, परंतु साप्ताहिक, वार्षिक भविष्य मात्र छापावेच लागते, कारण वाचकांची मागणी तशा तडजोडी करीत मुद्रित प्रसार माध्यमांना यापुढेही आव्हाने पेलावी लागतील. अरुण टिकेकर हा खरे तर गंभीर प्रकृतीचा पत्रकार. परंतु ‘लोकसत्ते’चे संपादक बनताच त्यांना पान पानभर सिनेनट्यांचे फोटो छापावे लागले. आपण मराठी ‘स्क्रीन’ तर वाचत नाही ना, अशी शंका यावी इतके ते बटबटीत असत. खप वाढण्यासाठी हे प्रयोग आहेत आणि ‘प्रॉडक्ट’ खपविण्यासाठी या सार्‍या खटपटी लटपटी अनिच्छेने का होईना, कराव्या लागतात. युवा वाचकवर्गाकडे डोळेझाक करून चालणार नाही, हा या पुढचा मूलमंत्र असेल. अग्रलेखांसाठी दैनिके वाचण्याचे दिवस संपले. आज सर्वेक्षण केल्यास संपादकीय वाचणारा वाचकवर्ग हा पन्नाशीच्या पुढचा आढळतो. मग ते दोन रकाने तरी कोणासाठी?

गंभीर वाचक घटतोय

कालच्या सायंदैनिकांप्रमाणे आजची दैनिके बनत चालली आहेत, कारण गंभीर वाचक कमी कमी होत आहे. यापुढे तो आणखी घटेल. मग शब्दकोडी, चित्रविचित्र, सिनेपरीक्षण, फॅशन शो यांच्यावर भर देण्याखेरीज अन्य पर्याय तरी कोणता? शेवटी जे खपते तेच द्यावे लागते. ग. वा. बेहरे यांचा ‘साप्ताहिक सोबत’आठवा. सोळा सोळा पाने मजकूर. एकही फोटो नसे. आज रविवारीच नव्हे तर सगळ्या पुरवण्या आणि अगदी दैनंदिन बातम्यांमध्येसुद्धा मजकूर तोंडी लावण्यापुरता आणि अंगावर येतील एवढी भली मोठी छायाचित्रे! सजावट हा आजच्या पत्रकारितेचा गाभा बनला आहे. मग आत्मा तडफडणार नाही तर काय? पण नाईलाज आहे. सुरवातीला म्हटले, आकाशवाणी कालबाह्य झाली. पण एफ. एम. स्टेशने जोरात चालतात, कारण तरुणाईची ती पसंती आहे. निवेदकांची नुसती चर्पटपंजरी. नाना पाटेकर किंवा गोविंदा यांची संवादशैली म्हणजे मशीनगनमधून सुटणार्‍या गोळ्या. एफ. एम. वाल्यांचे आदर्श ते. अध्येमध्ये नावापुरते गीत संगीत, तेही पाश्‍चात्त्य सुरावटींचे. कोण विचारतो लता मंगेशकरना? सुरेलपणा खुंटीला टांगला. तेच बहुधा यापुढे वृत्तपत्रांचे होईल. वाचकांच्या अभिरूचीला वळण लावण्याऐवजी त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे बदल केले नाहीत, तर वृत्तपत्रांना फार मोठी किंमत मोजावी लागेल. एकेकाळी क्रमशः स्वरूपाचे दीर्घ लेखन प्रसिद्ध व्हायचे. आज त्याकडे कोणी बघेल का? कालाय तस्मै नमः | काळाप्रमाणे बदलाल तरच टिकाल, हा नव्या जमान्याचा संदेश होय.

---

वाचनीय

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP